नागपूर - शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना अधिक प्रसिद्धी दिली जाते, तसेच या घटनांचे राजकारण जास्त होत असल्याचे मत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रसारमाध्यमांमध्ये अवास्तव प्रसिद्धी दिली जाते. यामुळे या आत्महत्यांचे विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून, गुलाबी बोंड अळीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जाणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने निर्देश दिले असून, येत्या एक महिन्यात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल, असे सिंह यांनी सांगितले. जीएम बियाणे विकसित करण्यात मोन्सॅंटो कंपनीची असलेली एकाधिकारशाही मोडीत काढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या एकाधिकारशाहीमुळे गुलाबी बोंड अळीचे संकट आले. या क्षेत्रात इतर कंपन्यांनाही संधी देण्यात येईल, असेही सिंह यांनी सांगितले.
|