शिक्षण विभागाला आदर्श शिक्षकांच्या सन्मानाचा विसर

शिक्षण विभागाला आदर्श शिक्षकांच्या सन्मानाचा विसर

आज शिक्षकदिन - जिल्ह्यातील चार शिक्षकांना मिळणार राज्यस्तरीय पुरस्कार

गडचिरोली - राज्यभरात दरवर्षी शिक्षकदिनी आदर्श शिक्षकांचा गौरव केला जातो. मात्र, यंदा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली नाही. 

संबंधित शिक्षकांची यादीसुद्धा तयार करण्यात आली नाही. शिक्षकदिनी आदर्श शिक्षकांचा सन्मान होणार नसल्याने शिक्षकांत संताप व्यक्त हो आहे. दुसरीकडे, या वर्षी जिल्ह्यातील चार शिक्षकांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी बोदली येथील शंकरराव मल्लेलवार हायस्कूलचे मुख्याध्यापक मनीष शेट्ये, राजू घुगरे, श्री. कुनघाडकर तसेच श्री. वैद्य यांची निवड झाली आहे. गेल्या वर्षी एका शिक्षकाचा राज्यस्तरीय पुरस्कार चांगलाच गाजला होता. राज्यस्तरीय पुरस्कार घेतलेल्या शिक्षकालाच शिक्षण विभागाने जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरविले होते. यावर काही शिक्षक संघटनांनी आक्षेप घेत शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षकावर कारवाईची मागणी केली होती. 

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षण विभागाकडून शिक्षकाकडून दरवर्षी प्रस्ताव मागितले जाते. यंदाही शिक्षण विभागाने पंचायत समितीस्तरावर पत्र पाठवून प्रस्ताव पाठविण्यासाठी सूचना दिली. अनेक शिक्षकांनी आपले प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविले; मात्र सध्या शिक्षकांच्या बदल्या प्रकरणात गाजत असलेल्या शिक्षण विभागाचे आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीकडे दुर्लक्ष केले आहे. शिक्षकदिनीच आदर्श शिक्षकांचा सत्कार केला जावा, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. मागील दोन वर्षांपासून शिक्षण विभागाकडून आपल्या सोयीनुसार शिक्षकदिनाचे आयोजन केले जाते. शिक्षकदिनी सार्वजनिक सुटी येत असली, तरी शाळामंध्ये शिक्षकदिन साजरा करा, असे पत्रक राज्याच्या शिक्षण विभागाने काढले.

शुक्रवारी सत्कार सोहळा

शिक्षण विभागाकडून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षकांसाठी निवड प्रक्रिया झाली नाही. सलग सुट्या आल्याने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा शिक्षण विभागातर्फे शुक्रवारी आयोजित केला जाणार असल्याची माहिती आहे. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या चार शिक्षकांना मात्र शिक्षकदिनी शासनातर्फे सन्मानित केले जाणार आहे.

आदिवासी विकास विभागाचा ‘खो’

राज्याच्या शिक्षण विभागाप्रमाणेच आदिवासी विकास विभागामार्फतही आश्रमशाळांतील आदर्श शिक्षकांची निवड करून त्यांना सन्मानित केले जात होते. मात्र, काही वर्षांपासून या विभागाकडून आदर्श शिक्षकांची निवड केली जात नाही. नक्षलग्रस्त भागात बिकट परिस्थितीत कित्येक शिक्षक प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. यामुळे आश्रमशाळांतील शिक्षकांतही संताप व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com