भेंडवळ (जि. बुलडाणा) - पीक आणि पाऊस या वर्षीच्या हंगामात समाधानकारक राहील. देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान कायम राहणार असून, दुष्काळी परिस्थिती फारशी उद्भवणार नाही, असे अंदाज भेंडवळच्या घटमांडणीने गुरुवारी दिले.
शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधणारी बहुचर्चित भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी (ता.18) सायंकाळी करण्यात आली होती. त्यानंतर आज सूर्योदयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज वाघ यांनी अंदाज व्यक्त केले. अक्षय तृतीयेला सायंकाळी गावाशेजारील शेतात घटमांडणी केली होती. गोल घट करून घटाच्या मधोमध खड्डा करण्यात आला. यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीक म्हणून चार मातीची ढेकळे व त्यावर घागर ठेवण्यात आली. या घागरीवर पापड, पुरी, सांडोळी, कुरडई, करंजी, भजा आणि वडा अशा प्रतीकात्मक खाद्य पदार्थांची मांडणी केली होती. घटात अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कपाशी, मटकी, मूग, उडीद, करडी, तांदूळ, जवस, तीळ, मसूर, हरभरा, वाटाणा, भादली आदी धान्यांची मांडणी केली होती. धान्य आणि खाद्य पदार्थांची पाहणी करून अंदाज व्यक्त करण्यात आले.
पावसाचा अंदाज देताना जूनमध्ये पाऊस सुरू होणार असला तरी, पेरण्या जुलैत होतील. चार महिन्यांच्या काळात साधारण स्वरूपातील पाऊस होईल. देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान कायम राहणार असला तरी, त्याला चिंता असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. यंदा मोठी नैसर्गिक आपत्ती नसेल. देशाचे शत्रू त्रास देतील; परंतु संरक्षण मजबूत असल्याने कुठलाही धोका होणार नाही. शेतमालाच्या भावात तेजीमंदीचा अंदाजही मांडण्यात आला.
|