प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी सरकारने उचलले पाऊल

dilip kambale.jpg
dilip kambale.jpg

नागपूर : पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पांमुळे धरणग्रस्तांचे पुनर्वसन केलेल्या गावांमध्ये त्यांना घरांसाठी दिलेल्या भुखंडांचे वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये तातडीने रुपांतर करण्यात येईल. त्यासाठी आवश्‍यकता भासल्यास तेथे शिबिर घेऊन हे काम केले जाईल, असे आश्‍वासन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या वेळी बुधवारी दिले. शिरूर तालुक्यात असा कॅम्प लावण्याचे त्यांनी सांगितले.

सुरेश गोरे यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला होता. ते म्हणाले, ‘‘प्रकल्पग्रस्तांंना दिलेला भूखंड त्याच्या मालकीचा असला पाहिजे. त्यांना भोगवटादार वर्ग एकमध्ये समावेश केल्यावरच त्यांना भूखंड हस्तांतरणाचे व्यवहार करता येतील. त्या बाबत लोकप्रतिनिधींनी मागणी केली असून, राज्य सरकारने केलेली कार्यवाही सांगावी.‘‘ 
बाबूराव पाचर्णे म्हणाले, ‘‘अनेक धरणांच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन शिरूर तालुक्यात झाले असून, त्यांची घरे नावावर करुन देण्याबाबत ऐकत्रित कार्यक्रम करावा.‘‘

कांबळे म्हणाले, ‘‘या पुनर्वसन गावठाणातील नागरिकांच्या भुखंडाचे वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये रुपांतर झाले आहे. त्यांच्या भूखंड हस्तांतरणावरील निर्बंध उठविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्या बाबतचा शासन निर्णय 18 मे रोजी जाहीर केला. आवश्‍यकता भासल्यास, तेथे शिबिर घेऊन कार्यवाही करू. या गावांतील अपूर्ण नागरी सुविधांबाबतही तातडीने निर्णय करू.

भीमराव तापकीर यांनी शिवणे ते नांदेड सिटीला जोडणारा पूल धोकादायक झाला असून, त्याची पुनर्बांधणी करण्याबाबत विचारणा केली. या प्रश्‍नाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे, की हा पूल आठमाही वाहतुकीसाठी बांधला आहे. शहरालहतच्या या पुलावरून जादा वाहने जात असल्याने तो अपुरा पडत आहे. मात्र पूल कमकुवत नाही. या पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला आहे.
राहूल कूल यांच्या प्रश्‍नाला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे, की शिरूर - सातारा राष्ट्रीय महामार्गावरील दापोडी व बोरीपार्धी येथील दोन्ही पूल अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या प्रकल्प अहवालाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत सुरू आहे. संग्राम थोपटे यांच्या प्रश्‍नाला दिलेल्या लेखी उत्तरात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले की, पुणे कोलाड रस्त्यावरील भूगावला अनेक मंगल कार्यालये असल्यामुळे तेथे वाहतूक कोंडी होते. तेथील सांडपाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले असून, वाहतूक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल. रस्ता सुधारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com