काटोल (जि. नागपूर) - इसापूर येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्याच्या आत्महत्येची घटना ताजी असताना सोमवारी (ता. 19) आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या ठिय्या आंदोलन मंडपाजवळ दिलीप मंठूजी लोही (वय 52) या भूमिहीन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. आंदोलकांना सकाळी जाग आली तेव्हा उपोषण मंडपाच्या बाजूला लोही मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शेजारी कीटकनाशकाची बाटली होती.
लोही हे काटोलच्या लक्ष्मीनगर भागात एकुलता एक मुलगा व पत्नीसोबत राहत होते. बारा वर्षांपासून ते लाडगाव येथील ज्ञानेश्वर वंजारी यांची साडेतीन एकर शेतजमीन ठेक्याने कसत होते. जोडधंदा म्हणून ते प्रवासी ऑटोही चालवायचे. नुकत्याच झालेल्या गारपिटीत पीक उद्ध्वस्त झाल्याने नैराश्यातून त्यांनी रविवारी (ता. 18) रात्री उशिरा ऑटो आंदोलनस्थळी उभा करून विष घेतले. त्याच स्थितीत त्यांचा मृत्यू झाला. सकाळी त्यांचा मृतदेह आढळून येताच आंदोलनस्थळी एकच खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
प्रल्हाद धोटे आणि दिलीप लोही या दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे स्थानिक व्यापारी संघाने बाजारपेठ बंद ठेवली. आमदार डॉ. आशीष देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल देशमुख, आरपीआय आठवले गटाचे विदर्भ प्रमुख भीमराव बन्सोड, कॉंग्रेसचे पुरुषोत्तम काकडे, शिवसेनेचे पुरुषोत्तम धोटे, लहूजी सेनेचे जीवन गायकवाड तसेच व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त नेतृत्वात मोर्चा काढून काटोल बंद ठेवण्यात आले. कामगार चौक, दुर्गा चौक, धंतोली, गळपुरा मार्गे मोर्चा कामगार चौकात परतला. यावेळी शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा या आणि अन्य मागण्या सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आल्या. मोर्चानंतर सभा झाली आणि नंतर तगड्या पोलिस बंदोबस्तात लोही यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
साखळी उपोषणाला सुरुवात
ठिय्या आंदोलनाच्या मंडपात सोमवारी शिवजयंतीपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. उपोषणाला पुरुषोत्तम काकडे, लक्ष्मण मेहेर, समीर उमप, राधेश्याम बासेवार, कोमल देशमुख, सुनील वडसकर, विजय महाजन, मोहन पांडे, अनुप राऊत, चंद्रशेखर कडू सहभागी झाले.
|