महापालिका, नागरिकांची फसवणूक : ओला, सुका वर्गीकरणाचा "कचरा'

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः घराघरांतून कचऱ्याचे वर्गीकरण करून द्यावे, असे आवाहन नागरिकांना करणाऱ्या महापालिकेनेच ओला व सुका कचरा वर्गीकरणाला हरताळ फासल्याचे चित्र आहे. नव्या कंपन्यांनी कचरा संकलनासाठी सुरू केलेल्या वाहनांमध्ये ओला व सुका कचऱ्यासाठी वेगवेगळे कप्पेच नसल्याचे उघडकीस आले. केवळ बाहेरून ओला व सुका कचरा असे लिहून या दोन्ही कंपन्यांनी नागपूरकरांची तसेच महापालिकेचीही फसवणूक केल्याचे यानिमित्त अधोरेखित झाले.


शहरात सध्या कचऱ्याची समस्या भीषण झाली आहे. एजी एन्व्हायरो व बीव्हीजी या कंपन्यांनी 16 नोव्हेंबरपासून कचरा संकलनासाठी सुरुवात केली. परंतु, अद्यापही शहरातील अनेक भागांतील कचऱ्याची उचल केली जात नसल्याने घरातील कचरा रस्त्यावर आला आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांवर प्रत्येकी एक लाखांचा दंड ठोठावण्यात आला. या कंपन्यांनी अद्याप शहरात पुरेशा कचरा गाड्या सुरू केल्या नसल्याचे प्रशासनाच्याही निदर्शनास आले आहे. मात्र, ज्या कचरा गाड्या सुरू आहेत, त्यात कचरा वर्गीकरणासाठी वेगवेगळे कप्पेच नसल्याचेही दिसून येत आहे.

शहराच्या विविध भागांत कचरा संकलनासाठी फिरणाऱ्या या वाहनांमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी दोन कप्पे करणे अपेक्षित आहे. परंतु, दोन कप्पे नसल्याने ओला व सुका कचरा एकाच वाहनात गोळा केला जात आहे. त्यामुळे कचरा वर्गीकरणालाच सुरुंग लागला आहे. शहरात फिरणाऱ्या अनेक वाहनांबाहेर ओला व सुका कचरा असे लिहिले आहे. परंतु, कचरा एकत्रच गोळा केला जात असल्याने या कंपन्यांकडून महापालिकेची व नागरिकांचीही फसवणूक केली जात आहे. या कंपन्यांमुळे महापालिकाही वर्गीकरणाच्या आग्रहाबाबत खोटारडी ठरत आहे.


नागरिकांची निराशा

महापौर, आयुक्तांनी नागरिकांना वर्गीकरण करा, अन्यथा कचऱ्याची उचल केली जाणार नाही, असा इशारा दिला होता. त्यामुळे अनेक नागरिकांनी कचरा वर्गीकरण करण्यास सुरुवात केली. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांपर्यंत नागरिक दोन डस्टबीन घेऊन येताना दिसत आहे. परंतु, आता वाहनांमध्येच वर्गीकरणासाठी कप्पे नसल्याचे नागरिकांच्याही निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकही कचरा वर्गीकरण गंभीरतेने न घेण्याचा धोका निर्माण झाला आहे.


प्रतिदिन दोन लाख दंडाची टांगती तलवार

शहरात सध्या कचरा उचलण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी पुरेसे वाहन उपलब्ध न केल्याने प्रत्येक कंपनीवर एक लाखांचा दंड ठोठावण्यात आला. कचऱ्याची उचल योग्यप्रकारे न झाल्यास दररोज प्रतिकंपनी दोन लाखांचा दंड ठोठावण्याचा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे. मात्र, अजूनही वाहनांची संख्या तोकडी असून उपलब्ध वाहनांमध्ये वर्गीकरणाची सोय नाही. त्यामुळे या कंपन्यांवर दररोज दोन लाख रुपये दंडाची टांगती तलवार आहे.

कचऱ्यासाठी वाहने लहान

शहरात दररोज 1200 टन कचरा गोळा होतो. सध्या दररोज निम्माच कचरा गोळा होत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्यांनी सुरू केलेली वाहने कचरा गोळा करण्यासाठी लहान असल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे पुरेसा कचरा गोळा करता येत नसल्याचेही या कर्मचाऱ्याने नमूद केले. एकाच भागात दोनदा जाणेही कठीण असल्याने काही घरांतील कचरा घेणे शक्‍य होत नसल्याची पुस्तीही त्याने जोडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com