नागपूर - विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोचविण्यासाठी कुशल पायलटची आवश्यकता असते. देशाचा पायलट म्हणून 125 कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. यापुढे त्यांच्या हातात देशाची सूत्रे ठेवणे धोक्याचे असल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आज नागपुरात केली.
अकोला येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते नागपुरात आले होते. नागपुरात आल्यानंतर प्रथम त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "गेल्या चार वर्षांत मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. मोदींबद्दल लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या.
शेतकऱ्यांना दामदुप्पट भाव देऊ, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, असे आश्वासन दिल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे, विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे जनता विचारत आहे. अच्छे दिन कुठे आहेत?'
हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी केलेला "पीएनबी' गैरव्यवहाराची माहिती मोदी यांना होती, असा आरोप करून ते म्हणाले, या संदर्भात पंतप्रधानांनी संसदेत बोलताना कबुलीही दिली आहे. "पीएनबी' गैरव्यवहाराबद्दल आपला नाईलाज असल्याचे वक्तव्य मोदींनी केले होते. याची पूर्वकल्पना असताना चुप्पी साधणे, हा देशद्रोह ठरत नाही काय? असा सवाल हार्दिक पटेल यांनी या वेळी केला.
पटेल म्हणाले...
- पीएनबी गैरव्यवहाराची माहिती नरेंद्र मोदींना होती
- शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे
- पाटीदार आंदोलन गुजरात विधानसभा निवडणुकीपुरते
- देशातील स्थिती चांगली नसल्याने शेतकरी, युवकांच्या आंदोलनात सहभाग
|