वन्यप्राण्यांना बसणार पाणीटंचाईची झळ

Animal
Animal

नागपूर - विदर्भात यंदा सरासरी ६० टक्केच पाऊस झाल्याने ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव नागझिरा आणि बोर व्याघ्र प्रकल्पासह अभयारण्यातील वन्यप्राण्यांना पाणीटंचाई जाणवण्याची शक्‍यता आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून दोन महिन्यांपासून नैसर्गिक पाणवठ्यांसह नाले व कृत्रिम तलावांच्या स्थितींचा आढावा घेतला जात आहे. पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

विदर्भातील गोदिंया व भंडारा जिल्ह्यात यंदा सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ५२ टक्केच पाऊस झाला. ताडोबा प्रकल्पालगतच्या इरई धरणात ३६ टक्के जलसाठा आहे. दरवर्षी पावसाळ्यात इरई धरण तुडूंब भरलेले असते. यंदा पावसाअभावी धरणातील जलस्तर बराच खाली गेलेला आहे. केवळ इरई धरणच नाही, तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची जीवन वाहिनी असलेल्या अंधारी नदीतील जलस्तरही कमी झालेला आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील पाण्याच्या साठाही अनेक वर्षांनंतर प्रथमच ५० टक्‍क्‍याची खाली आला आहे. हा प्रकल्प नागपूरकरांची जीवन वाहिनी आहे. त्याचबरोबर पेंच व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांचीही जीवन वाहिनी आहे. मध्यप्रदेशात बांधलेल्या चवराई धरणामुळे यावर्षी त्या परिसरात पाणी अडविले. त्याचा फटका तोतलाडोह प्रकल्पाला बसला असून, पाण्याची पातळी घटली आहे. परिणामी जंगलातील पाणीसाठा कमी झाल्याने वन्यप्राण्यांची तहान भागविण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अनेक नैसर्गिक पाणवठेही यंदा आटल्याने चिंता वाढली आहे. त्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. नैसर्गिक पाणवठे आणि कृत्रिम पाणवठ्याची दुरुस्ती सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे.

मार्चमध्येच सोसावी लागणार झळ!
गोंदिया व भंडारा जिल्ह्यातही फक्त ४९ ते ५० टक्के पाऊस झाला. त्यामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील जलसाठा कमी झालेला आहे. वन्यप्राण्यांना आताच पाण्यांच्या टंचाईसाठी भटकती करावी लागत आहे. येत्या काळात मानव व वन्यजीव संघर्ष होण्याची शक्‍यता आहे. नियोजन न केल्यास वन्यप्राण्यांना मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे.

विदर्भात यंदा पाऊस कमी झाल्याने वन्यप्राण्यांना पाण्याची टंचाई जाणवणार आहे. त्यादृष्टीने सर्वच अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाला जंगलातील पाण्याचे स्त्रोतांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
- रामबाबू, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com