नागपूर - "चाळीस वर्षे जंगलांमध्ये राहिलो आणि अनुभवाने लिखाण केले. दोन दिवस जंगलात राहून पुस्तक लिहिणारे, माझ्या कामाचा वारसा थोडेच पुढे जाणार? त्यासाठी रानवाटा झिजवाव्या लागतात,' या शब्दांत "अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांनी मनातील सल बोलून दाखवली. राज्य शासनाने त्यांना जाहीर केलेला विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारही ते "जंगलाचच देणं' समजतात.
मोठ्या साहित्यिकाच्या नावाने पुरस्कार मिळाल्याचा आनंद ते व्यक्त करतात. परंतु, हा क्षण वाटून घेण्यासाठी मुलगी हयात नाही, या विचारांनी त्यांचे डोळेही पाणावतात. लक्ष्मीनगरमधील अपार्टमेंटमध्ये एकटे राहणारे माजी संमेलनाध्यक्ष व वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली वयाच्या 85 व्या वर्षीही कणखरपणे उभे आहेत, ते केवळ अनुभवाची समृद्धी आणि साहित्य संपदेच्या जोरावर. "फडके, खांडेकर यांच्या साहित्यात नायक-नायिकांच्या पार्श्वभूमीवर निसर्ग यायचा. त्यांच्या साहित्यात निसर्ग कायम दुय्यम राहिला आहे. माझ्या संहितेत निसर्गच नायक आहे. वाघ, हत्ती, हरीण हे माझ्या लिखाणातील नायक आहेत. मराठी साहित्यात असे लिखाण कधीच झाले नाही. प्रसिद्ध लेखकांनी कधीही मराठीत कोश लिहिला नाही, मी लिहिला. मी एक लाख नवीन शब्द दिलेत. हे सर्व दोन दिवस जंगलात फिरून साध्य झाले नाही. त्यासाठी चाळीस वर्षे फिरलो, अभ्यास केला,' असे सांगतानाच आज कुणीही अभ्यासाच्या दृष्टीने जंगलात राहायला तयार नाहीत, अशी खंतही मारुती चितमपल्ली व्यक्त करतात.
|