मेहकर - बुलडाणा जिल्ह्यातील 140 गावांत राष्ट्रीय पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाला असून, त्यास जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी आज (ता. 18) सोनाटी शिवारातील बोरी नळ योजनेच्या विहिरीत बसून अनोखे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की 140 गावांत हा भ्रष्टाचार झाला असून, यापैकी 120 गावांत पिण्याचे पाणी नाही. काही ठिकाणी टाकी आहे, तर पाइपलाइन नाही. या योजनेत जे काम झाले त्या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा थेंब मिळाला नाही. अनेक गावांतील महिलांना आजही मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे.
शासकीय योजना बंद असून, खासगी योजना सुरू कशा राहतात, असा सवालही सावजी यांनी उपस्थित करत ज्या गावात विहीर खोदण्याचे काम नव्हते, त्या गावात 2 ते 3 विहिरी घेतल्याचे, तसेच अनेक विहिरींचे दानपत्रसुद्धा न झाल्याचा आरोप केला.
मातमळ येथील आंदोलनाची आठवण
मातमळ येथे गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याची अडचण होती. त्या वेळी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1997 साली अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची आज नागरिकांना पुन्हा एकदा आठवण झाली.
|