ना चिठ्ठी ना कोई संदेश; तुम चले परदेश!

ना चिठ्ठी ना कोई संदेश; तुम चले परदेश!

मुंडे यांनी नोटाबंदी निर्णयाची उडवली खिल्ली
नागपूर - 'ना चिठ्ठी ना कोई संदेश, लाइन में लगाके देश, तुम चले गए परदेश...' या भाषेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाची सभागृहात खिल्ली उडवली.

केंद्राच्या नोटाबंदी निर्णयामुळे राज्यासह देशात निर्माण झालेली गोंधळाची स्थिती, बॅंकांच्या रांगेत नागरिकांचे बळी गेल्याचा मुद्दा मुंडे यांनी सभागृहात अल्पकाळ चर्चेत उपस्थित केला. ते म्हणाले, चलन दुष्काळामुळे राज्यात निर्माण झालेले केंद्राचा नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे.

नोटाबंदीच्या वेळी पंतप्रधानांनी जाहीर केलेले ध्येय मागे पडले असून, आता सोसायटी "कॅशलेस' झाली आहे. चलन दुष्काळामुळे राज्यात निर्माण झालेले विदारक चित्र त्यांनी मांडले. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाच्या आसमानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला यावर्षी सरकारनिर्मित चलन दुष्काळाच्या सुलतानी संकटाचा सामना करावा लागला. कापूस, सोयाबीन, कांदा, मोसंबी, संत्री अशा पिकांना गेल्यावर्षी मिळालेला दर, तसेच यावर्षी नोटाबंदीपूर्वी व नंतर मिळणारा दर याची तुलना त्यांनी केली. कमी दरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. निवडणुकीच्या वेळी सामान्यांच्या बॅंक खात्यात 15 लाख रुपये जमा होतील, अशी अनेक आश्वासने दिली होती. ती पूर्ण होत नसल्यानेच पंतप्रधानांनी त्यांच्या "टू ड्रिम इम्पॉसिबल' सवयीप्रमाणे निर्णय घेतला. त्याचा त्रास देशातील सव्वाशे कोटी जनता भोगत आहे. पंतप्रधानांच्या नोटाबंदीनंतर कामाच्या ताणामुळे बॅंक अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पैसे मिळत नसल्याने एका निवृत्त कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. देशात 70, तर राज्यात 12 जणांचा बॅंकेच्या रांगेत मृत्यू झाला. या मृत्यूंना जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवणार का, असा प्रश्नही मुंडे यांनी उपस्थित केला.

बॅंकेसमोर मृत पावलेल्यांना श्रद्धांजली
नोटाबंदीनंतर पैसे काढण्यासाठी रांगेत उभे असताना मृत पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून विरोधकांनी विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांना अचानक धक्का दिला. विशेष म्हणजे, सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सर्वच सदस्य श्रद्धांजलीसाठी आपापल्या जागेवर उभे झाले. त्यांना काही कळायच्या आतच श्रद्धांजलीचा कार्यक्रम आटोपला.

पैसे काढण्यासाठी बॅंकेसमोर उभे राहणारे देशभक्त असे सरकार म्हणते. असे असेल तर रांगेत उभे असताना मृत पावलेल्यांना हुतात्म्यांचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. नोटाबंदीवर आपल्या भाषणाच्या ओघात त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व सदस्यांना दोन मिनिटे उभे राहण्याची विनंती केली. सवयीप्रमाणे सर्व सदस्य उभे राहिले. सभापतीही आपल्या जागेवर उभे राहिले. अशा पद्धतीने मुंडे यांनी आपली मागणी पूर्ण करून घेतली. विशेष म्हणजे लोकसभेत श्रद्धांजलीचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर विधान परिषदेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याने सत्ताधारी चांगलेच अडचणीत आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com