'प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करावा'

'प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करावा'

नागपूर - इमारतीचा पाया मजबूत असल्यास ती इमारत दीर्घकाळ उभी राहू शकते. त्याचप्रमाणे शिक्षणाचा पाया मजबूत करायचा असेल तर, प्राथमिक शिक्षणाला हा खऱ्या अर्थाने मजबूत करण्याची गरज असल्याचे मत शाळा संचालक आणि व्यवस्थापकांनी ‘सकाळ’तर्फे शहर कार्यालयात आयोजित ‘कॉफी विथ सकाळ’ या उपक्रमात व्यक्त केले.

देशाच्या एकंदरीत शिक्षणाचा विचार केल्यास, उच्च शिक्षणाचा बरेच महत्व दिले जाते. मात्र, ज्या शिक्षणातून मुलगा प्रथम जातो, त्या शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नाही. शिक्षणातून समाजाला एक चांगला नागरिक तयार करता यावा, अशीच शिक्षणपद्धती असणे गरजेचे आहे. मात्र, केवळ घोकणपट्टी शिकविणारी शिक्षणपद्धती कामाची नसल्याचे मत नारायण विद्यालयाचे संचालक रोशन ढोरे यांनी व्यक्त केले. चंदादेवी सराफ स्कुल (आयसीएसई) संचालिका निशा सराफ म्हणाल्या, शिक्षणामध्ये ‘ऑब्जेक्‍टीव्ह’पेक्षा ‘ऑब्जरवेशन’असणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षणामध्ये बऱ्याच प्रमाणात बदल हवे आहे. मात्र, हे बदल वारंवार करण्यापेक्षा एकदाच संपूर्णत: अपेक्षित आहे. शिवाय ते मातृभाषेतून असावे, त्यानंतर इतर भाषा शिकविण्यास शाळांनी आग्रही असावे. विशेष म्हणजे त्यासाठी तज्ज्ञ शिक्षक नेमण्याची गरज आहे. आयसीएसई अभ्यासक्रमाचा विचार केल्यास बराच अभ्यासक्रम प्रात्यक्षिकस्तरावर आहे. सेंट पॉल स्कुलचे संचालक राजाभाऊ टांकसाळे म्हणाले, आज खासगी ट्युशन क्‍लासेसची समस्या वाढली आहे. मुलांचा शाळांपेक्षा क्‍लासेसवर विश्‍वास वाढला आहे. त्यामुळे सर्वाधिक मुले शाळांमध्ये कमी आणि क्‍लासेसमध्ये जास्त असतात. पालकही त्यासाठी आग्रही असतात. त्यामुळे शाळांना याचा त्रास होतो. अनेकदा पालक स्वत: मुलांना वेळेत सवलत देण्याची मागणी करतात. सेंट झेव्हीअरचे सेंट्रल इंडिया हेड निशिथ विजयन म्हणाले, शिक्षणाच्या दर्जा उंचावण्यासाठी निश्‍चित असे धोरण असल्याचे दिसून येत नाही. एकंदरीत शिक्षणाचे धोरण पालक, विद्यार्थी, शिक्षक, समाज आणि प्रत्येकवेळी बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा वेध घेणारे असावे. तसेच होताना दिसून येत नाही. त्यामुळे घोळ होताना दिसत आहे. शिक्षणाच्या विकासामध्ये प्रामुख्यत्वे प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातूनच या सर्व समस्या निर्माण होताना दिसून येत आहे. त्या सोडविण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचा फोकस करण्याची गरज आहे. मात्र, सध्या आरटीईनुसार घेण्यात आलेल्या प्रवेशामुळे जवळपास सर्वच शाळा त्रस्त आहेत. प्रवेश घेतल्यानंतर अद्यापही त्याचे अनुदान शासनाकडून आलेले नाही. याउलट ज्यांनी त्याचा फायदा घ्यावा, त्यांना हा फायदा कधीच मिळत नसल्याचे मत ललिता पब्लिक स्कुलच्या संचालिका चेतना टांक यांनी व्यक्त केले. प्रहार समाजजागृती संस्थेच्या विश्‍वस्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे म्हणाल्या,‘विद्यार्थ्यांना शिक्षण देताना, एक हेल्दी वातावरणाची निर्मिती करणे गरजेचे असते. ते वातावरण शाळांप्रमाणेच पालकांनीही देण्याची गरज आहे. आमच्या शाळेत मुले बारा तास असतात. शिवाय शाळांमध्ये त्यांचे दफ्तर असते. शाळेतच त्यांचा अभ्यास आणि इतर खेळप्रकार होतात. मात्र, पालकांच्या अपेक्षा खुप जास्त असल्याने ते दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com