काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी ‘होल्ड’वर

काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी ‘होल्ड’वर

नागपूर - विविध जिल्ह्यांतून प्रदेश काँग्रेस कमिटीवर पाठविण्यात नागपूरमधील प्रतिनिधींना केंद्रीय निवडणूक प्रमुखाने ‘होल्ड’वर ठेवल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण गटाला जबर हादरा बसला आहे. विशेष म्हणजे नेत्यांमधील टोकाला गेलेली भांडणे आणि आपसांतील मतभेदांमुळे नागपूर शहर काँग्रेस कमिटीची संघटनात्मक निवडणूकसुद्धा स्थगित करण्यात आली आहे. 

शहर काँग्रेस कमिटीच्या निवडणुकीचे काही खरे नसल्याने नागपूरमधून माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी राज्यसभा सदस्य अविनाश पांडे, अनंतराव घारड, बबनराव तायवाडे, अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री, अभिजित सपकाळ, मुन्ना ओझा यांना चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, अमरावती अशा विविध जिल्ह्य काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी म्हणून प्रदेशवर पाठविण्यात आले आहेत. अनंतराव घारड यांना नांदेड जिल्ह्यातून पाठविण्यात आले. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनीस अहमद यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थानच देण्यात आले नाही. यामुळे त्यांनी थेट केंद्रीय निवडणूक प्रमुख मुलापल्ली रामकृष्ण यांच्याकडे आक्षेप नोंदवला. प्रदेशवर पाठविण्यात आलेले प्रतिनिधी बूथच्या प्राथमिक फेरीतूनच निवडून आलेले नाहीत, असे असतानाही त्यांना प्रदेशवर पाठविण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. काँग्रेसच्या घटनेनुसार प्रदेशवर महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातून प्रतिनिधी पाठविता येतो. मात्र, तो प्रथम बूथ निवडणुकीत प्रतिनिधी म्हणून निवडून येणे आवश्‍यक आहे. नियमानुसार, आक्षेप योग्य असल्याने शहरातील प्रदेश प्रतिनिधींना होल्डवर ठेवण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

शहराची निवडणूक स्थगित
महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून मुत्तेमवार आणि चतुर्वेदी-राऊत गटांचे वाद विकोपाला गेले आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी प्रदेशाध्यक्षांवर शाई फेकून राग व्यक्त केला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या महापालिकेतील गटनेत्याला आव्हान दिले. विकास ठाकरे यांना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत येण्यापासून रोखले. याचा वचपा काढण्यासाठी दोन्ही गटांतर्फे संघटनात्मक निवडणुकीत फिल्डिंग लावण्यात आली होती. मात्र, बोगस सदस्य नोंदणी केल्याच्या तक्रारी करून निवडणूकच स्थगित करण्यात आली आहे. 

रागाचे कारण 
सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनीस अहमद आमदारच नव्हे, तर राज्याच्या मंत्रिमंडळातसुद्धा अनेक वर्षे होते. प्रफुल्ल गुडधे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली. त्यांच्या तुलनेत ज्युनिअर असलेल्या तसेच आजवर कुठलीही निवडणूक न लढलेल्यांना प्रदेश कमिटीवर पाठविण्यात आले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गटबाजी केली. पक्षाचा विचार केला नाही. फक्त आपल्याच समर्थकांना प्रदेशवर पाठविल्याचा चतुर्वेदी-राऊत गट समर्थकांचा आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com