दीक्षाभूमी विकासाच्या मास्टर प्लॅनचे काय झाले?

दीक्षाभूमी विकासाच्या मास्टर प्लॅनचे काय झाले?

नागपूर - ५९ व्या धम्मचक्रप्रवर्तन दिन सोहळ्यात दीक्षाभूमी विकासाचा मास्टर प्लॅन तयार होत असून, जगातील सर्वोत्तम सुंदर स्थळ दीक्षाभूमी व्हावे, म्हणून सर्व व्यवस्था येथे केली जाईल. त्यासाठी जितकी जागा लागेल, ती उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परंतु, दीक्षाभूमीचा मास्टर प्लॅन कुठे हरवला, हे कळायला मार्ग नाही. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाजूला असलेल्या कृषी विभागाची जागा उपलब्ध करून देण्याची हमी देताना जागा कमी पडून देणार नाही, असे आश्‍वासन लाखो बौद्ध अनुयायांसमोर दिले होते. याशिवाय दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी ५९ व्या धम्मदीक्षेच्या वर्धापनदिन सोहळ्यात दिली दिली होती. मात्र, यापैकी एकही आश्‍वासन पाळले नसून, दीक्षाभूमीवर ‘जैसे थे’ अशी अवस्था आहे. पिण्यासाठी कायमस्वरूपी पाण्याचीही येथे सोय नाही. कृषी विभागाचा भूखंड न मिळाल्यामुळे तीन प्रवेशद्वाराचे दीक्षाभूमीचे स्मारक आहे. चौथे प्रवेशद्वार कृषी विभागाची जागा मिळाल्यास काचीपुऱ्याच्या दिशेने निघणाऱ्या मुख्य रस्त्यावरून तयार होईल. शनिवारी होणाऱ्या ६१ व्या धम्मचक्रप्रवचन सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे आहेत, याशिवाय केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंगदेखील आहेत. तेव्हा आतातरी जागेचा तिढा सुटणार काय? याकडे लाखो बौद्ध अनुयायांचे लक्ष लागले आहे. डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या विश्‍वस्तांपर्यंत गेल्या तीन वर्षांत दीक्षाभूमी विकासाचा कोणताही मास्टर प्लॅन पोहोचला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपुरात होणार होते ‘बार्टी’ उपकेंद्र? 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थे (बार्टी)चे उपकेंद्र नागपुरात सुरू करण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ५९ व्या धम्मदीक्षा सोहळ्याच्या वर्धापनदिन सोहळ्यात केली होती. ही घोषणा अद्याप हवेत आहे. वंचितांच्या आयुष्यात कौशल्याची भर टाकून ‘बार्टी’च्या माध्यमातून तरुणाईला दुर्मिळ संधीचा लाभ उपलब्ध देऊन युवकांना यशोशिखरावर पोहोचवण्याच्या प्रयत्नाला यश येत आहे. परंतु, विदर्भातील गरीब अनुसूचित जातींमधील तरुणांना वारंवार पुण्याला जाणे शक्‍य नाही. बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे यांनी महिन्यातून दोन वेळा नागपूरच्या उपकेंद्रातील कार्याचा आढावा घेतल्यास विदर्भातील तरुणांना बार्टीच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com