शेतकऱ्यांचे मुंडन; भाजपचे खंडन

शेतकऱ्यांचे मुंडन; भाजपचे खंडन

नागपूर : मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात सतिश चौधरी या शेतकऱ्याने मुंडन करून सरकाचा निषेध नोंदवला. रस्त्यावर भाजीपाला फेकून तीव्र संताप  व्यक्‍त करण्यात आला. तर त्याचवेळी भाजप नेत्यांनी काँग्रेसच्या विरोधात आणि सरकारच्या समर्थनार्थ जोरदार निदर्शने देत सरकारविरोधातील आरोपांचे खंडन केले.

हिंगणा तालुका कॉंग्रेस कमिटी व शेतकऱ्यांच्या नेतृत्त्वात 'भाजपा सरकार हाय हाय', 'शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे', 'शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर ढोंग करणे बंद करा', 'शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे,' 'किसानो के सन्मान मे हम सब मैदान मे' अशी जोरदार नारेबाजी करित आज (ता.९) आंदोलन केले. दोन दिवसांत कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला नाही तर पेटून उठण्याचा इशाराही देण्यात आला. भाजपाने देखील याच परिसरात पेंडाल टाकून समर्थनार्थ निदर्शने केली. सरकारच्या विकास कामांचा पाढा वाचून दाखविला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत दोन्ही पक्षांमध्ये जवळपास तीन तास जुगलबंदी रंगली. या निदर्शनांमुळे घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांचीही चांगलीच दमच्छाक झाली. कुंदा राऊत यांच्या नेतृत्वात कांग्रेसने आंदोलन केले. तर जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार व आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात भाजपने निदर्शने केली.

भाजप घाबरले
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण बाजुला ठेऊन आम्ही आंदोलन केले. मात्र आपला खरा चेहरा जनतेसमोर येईल या भितीने भाजपवर आमच्या शेजारी पेंडाल टाकून आंदोलन करण्याची वेळ आली. विकास कामे केली असली तर आंदोलन करुन सांगण्याची गरज पडली नसती. सरकारला रस्त्यावर उतरून विकास कामे सांगावी लागतात, ही शरमेची बाब आहे," अशी टिका करीत कुंदा राऊत यांनी चापलुसी बंद करण्याचा इशाराही सरकारला दिला.

"वीज मॅनेज कराल पण बॅटरी नाही" 
कॉंग्रेस नेत्यांची भाषणे सुरू असताना वीज पुरवठा खंडीत झाला. हा देखील आंदोलकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न आहे, अशी टिका करण्यात आली. 'तुमची सत्ता आहे म्हणून विज मॅनेज केली मात्र बॅटरी लावून आम्ही आवाज बुलंद करणार. विज मॅनेज कराल पण बॅटरी मॅनेज करू शकणार नाही,' असेही काँग्रेस नेते म्हणाले. 

"सरकारची खरी कामे सांगण्याचा प्रयत्न"
भाजप आंदोलन करीत नसून सरकारची खरी कामे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. खोटे बोललो असतो तर रस्त्यावर उभे झालो नसतो. खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, हीच आमची भूमिका आहे, या शब्दांत जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांनी प्रत्युत्तर दिले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com