नागपूर - साडेअकरा हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या गैरव्यवहाराची व्याप्ती खूप मोठी असून, केंद्रातील मोदी सरकार बरीच माहिती लपवित आहे. यामुळे याप्रकरणाची न्यायमूर्तींमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी शुक्रवारी केली.
आमदार आशिष देशमुख यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर सिन्हा यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""नीरव मोदी याचा गैरव्यवहार "यूपीए'च्या काळात 2011 मध्ये सुरू झाला, असा दावा भाजपतर्फे केला जात आहे; परंतु गेल्या चार वर्षांपासून मोदी सरकार सत्तेवर आहे. या काळात हा गैरव्यवहार उघड का झाला नाही?'' यातील मुख्य सूत्रधार नीरव मोदी याचा समावेश डाव्होस येथील पंतप्रधानांच्या दौऱ्यात कसा झाला? असा सवाल करून ते म्हणाले, पंतप्रधानांच्या दौऱ्यात नीरव मोदीचा झालेल्या समावेशाबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा युक्तिवाद हास्यास्पद आहे.
"जीएसटी'त सुधारणा आवश्यक
"जीएसटी'चा एक दर असावा, ही कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सूचना चांगली असली तरी सध्या तरी व्यवहार्य नाही, असे सांगून ते म्हणाले, सध्या पाच स्तरीय योजना आहे. यात सुसूत्रता आणण्यासाठी पहिल्यांदा "जीएसटी'चे तीन दर करावे, अशी सूचना त्यांनी केली. "जीएसटी'चे दर हळूहळू एकच दर करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
|