गेली झाडे कुणीकडे?

गेली झाडे कुणीकडे?

नागपूर - शहरात १०० किलोमीटरपेक्षा जास्त सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. सिमेंट रस्त्यांमुळे शहराच्या तापमानात वाढ होण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. मात्र, महापालिकेकडे अद्याप सिमेंट रस्त्यांमुळे वाढत्या तापमानावर नियंत्रणासाठी धोरण नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा भाषणातून सिमेंट रस्त्यांच्या मध्यभागी दुभाजकांवर झाडे लावण्याच्या केलेल्या सूचनेलाही महापालिका व कंत्राटदारांनी केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे. परिणामी भविष्यात सिमेंट रस्ते ‘ताप’ देई ठरणार असल्याची शक्‍यता आहे.

शहरात पहिल्या  टप्प्यात निम्म्यापेक्षा जास्त सिमेंट रस्ते तयार झाले. दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहे तर तिसऱ्या टप्प्यातही अनेक रस्ते प्रस्तावित आहे. शंभर किमीपेक्षा जास्त सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. याशिवाय मेट्रो रेल्वे व उड्डाणपुलाची कामे सुरू असून यातही मोठ्या प्रमाणात सिमेंटचाच वापर होत आहे. शिवाय शहरात बहुमजली इमारतीही उभ्या होत आहे. पर्यावरणासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा भाषणातून रस्त्यांच्या मध्यभागी झाडेच नव्हे तर वेगवेगळी फुलझाडे लावण्याच्या सूचना केल्या. मात्र, शहरात पूर्ण झालेल्या सिमेंट रस्त्यांच्या मध्यभागी कुठेही झाडे दिसून येत नाही. 

एकीकडे दरवर्षी पावसाळ्यात वादळामुळे जुनी झाडे पडत आहेत. गेल्या पाच वर्षांत ५०० जुनी झाडे पडली. मागील वर्षी महापालिकेने राज्य शासनाच्या एक पाऊल हरितक्रांतीकडे या योजनेतून ४५ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला होता. मात्र, पूर्ण झालेल्या सिमेंट रस्त्यांच्या मध्यभागी एकही झाड लावल्याचे कुठेच दिसून येत नाही. 

पश्‍चिम नागपुरातच हिरवाई 
पश्‍चिम नागपुरात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. त्यामुळे हा परिसर उन्हाळ्यातही सुसह्य असतो. परंतु, शहराच्या इतर भागांमध्ये झाडांची कमतरता आहे. सिमेंट रस्त्यांमुळे वाढत्या तापमानावर नियंत्रणासाठी शहराच्या इतर भागातही गर्द हिरवाईची गरज व्यक्त केली जात आहे. 

साडेसात हजार झाडे कुठे आहेत?
मागील वर्षी महापौर नंदा जिचकार यांनी सिमेंट रस्ते व मुख्य रस्त्यांच्या बाजूला साडेसात हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, सिमेंट रस्त्यांच्या बाजूला मागील वर्षी लावलेली साडेसात हजार झाडे आता संशोधनाचा विषय ठरला आहे. 

सिमेंट रस्त्यांमुळे निश्‍चितच तापमान वाढणार असून झाडे लावणे हाच उपाय आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचे लाइट्‌स चालकांच्या डोळ्यावर पडल्याने अपघाताची शक्‍यता असते. त्यामुळे रस्त्यांच्या मध्यभागी झुडपही आवश्‍यक आहे. 
- अमिताभ पावडे,  माजी कार्यकारी अभियंता, एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com