नागपूर - वातावरणातील बदलामुळे यंदा आवश्यक तापमान त्या ऋतूमध्ये फळ आणि फुलांना उपलब्ध होऊ शकले नाही. त्याचा परिणाम फुले आणि फळांच्या झाडावरील फुलोऱ्यांवर झाला असल्याचा निष्कर्ष वनस्पतीशास्त्र अभ्यासकांनी काढला आहे. यामुळे यंदा फळांचे उत्पादन घटण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
मॉन्सूनपूर्वी संत्र्याच्या झाडाला दरवर्षी फुलोरा येतो. त्याला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले तर संत्र्याच्या झाडावरील फुलोरा टिकून राहतो. फळधारणा होते. झालेली फळधारणा टिकून राहण्यास मदत होते. परंतु, यंदा ऋतुमानच समोर गेल्याने जूनमध्ये फळझाडे आणि फुलांना त्या प्रमाणात आर्द्रता व दमट वातावरण मिळू शकले नाही. त्यामुळे फुलोरा येण्यास आणि पुढे फुलोऱ्यांचे रूपांतर फळधारणेत झाले नाही.
फळांना परिपक्वता येऊ शकली नाही. तसेच इतरही फळझाडे आणि फुलझाडांना वातावरणाचा फटका बसला. त्यामुळेच फुले येणाऱ्या झाडांवरील फुलोरा उशिरा आला अथवा काही प्रमाणात कमीही झाला आहे. तसेच फळांचे उत्पादनही कमी झाले. झाडांना फळे उशिरा दिसू लागली आहेत. यंदा रामफळ आणि सीताफळांना पुरेसा फुलोरा आलेला नाही. त्यामुळे यंदा रामफळ आणि सीताफळाचे उत्पादन घटण्याची शक्यताही वनस्पती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
यंदा ऋतुमानात एक ते दोन महिन्यांचे अंतर पडल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात फटका फळे, पिके आणि फुलांच्या उत्पादनावर झाल्याचे दिसून येत आहे. गव्हाला आवश्यक असलेला थंडीचा कालावधीही कमी झाला आहे. त्याचाही परिणाम गव्हाच्या उत्पादनावर होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीचा फटकाही संत्री, डाळिंब, द्राक्ष आणि आंब्यांच्या फुलोऱ्यांवर झाला आहे. मार्च ते एप्रिल महिन्यात रामफळ मोठ्या प्रमाणात बाजारात येतात. यंदा फुलोराच उशिरा आणि कमी असल्याने रामफळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याचे शक्यता कमी असल्याचे वनस्पती शास्त्रज्ञ अभ्यासक सुधीर बावनकर यांनी सांगितले.
|