नागपूर - पीएनबी घोटाळ्यातील नीरव मोदी व आयपीएल घोटाळ्यातील ललित मोदी यांनी देशाची प्रतिमा मलिन केली असून हे "मोदी' देशाला काळिमा फासत असल्याची प्रतिक्रिया योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले व्यक्ती असल्याचे सांगितले.
बाबा रामदेव यांचे आज (ता. 19) नागपुरात आगमन झाले. तेथून ते चंद्रपूर जिल्ह्यात रवाना झाले. यापूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, मी केवळ एकाच मोदींना ओळखतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या प्रगतीसाठी कार्य करीत आहेत. इतर मोदींचे मला माहीत नाही. नीरव मोदी व ललित मोदी यांनी केलेल्या घोटाळ्यांमुळे देशाचे नुकसान झाले आहे. देशाची प्रतिमा खराब झाली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार या दोन्ही आरोपींवर कारवाई व्हायला पाहिजे. या दोघांनी केलेल्या घोटाळ्यांनी देशाला काळिमा फासली आहे. परंतु, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोषी ठरविता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मिहानमध्ये पुढील वर्षापासून उत्पादन
नागपुरातील मिहान प्रकल्पात पतंजलीतर्फे सुरू होणाऱ्या फूड पार्कचे उत्पादन पुढील वर्षापासून सुरू होईल, असा दावा बाबा रामदेव यांनी केला. मिहान प्रकल्पात पतंजलीतर्फे फूड पार्कचे भूमिपूजन गेल्या वर्षी झाले होते. गेल्या डिसेंबर महिन्यात उत्पादन सुरू होईल, असे आश्वासन बाबा रामदेव यांनी दिले होते. परंतु, फूड पार्कमध्ये डिसेंबर महिन्यात उत्पादन सुरू होऊ शकले नाही. या संदर्भात बोलताना बाबा रामदेव म्हणाले, जमिनीच्या हस्तांतरणात उशीर झाल्याने नियोजित वेळेत प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. आता या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. या प्रकल्पाचे बांधकामही सुरू झाले आहे. ही कामे काही महिन्यांतच पूर्ण होणार असून उत्पादनाला पुढील वर्षापासून सुरू होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
|