महाराष्ट्र सरकार भिकारचोट! - ॲड. श्रीहरी अणे

संविधान चौक - वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी राबविलेल्या रक्ताक्षरी अभियानाच्या समारोपप्रसंगी रक्ताक्षरी करताना ॲड. श्रीहरी अणे; सोबत ॲड. नीरज खांदेवाले व अन्य.
संविधान चौक - वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी राबविलेल्या रक्ताक्षरी अभियानाच्या समारोपप्रसंगी रक्ताक्षरी करताना ॲड. श्रीहरी अणे; सोबत ॲड. नीरज खांदेवाले व अन्य.

नागपूर - अच्छे दिनासाठी पैसे लागतात; पण महाराष्ट्र सरकार भिकारचोट आहे. आपल्याला पोसतील ही अपेक्षा भिकारचोट राज्याकडून करणेही चुकीचे आहे, अशी घणाघाती टीका विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्रीहरी अणे यांनी केली.

विदर्भ राज्य आघाडीतर्फे वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी १ मेपासून सुरू असलेल्या रक्‍ताक्षरी अभियानाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आघाडीचे कार्याध्यक्ष ॲड. सन्याल, सचिव ॲड. नीरज खांदेवाले, ज्येष्ठ विदर्भवादी नेते उमेश चौबे, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार,  चरणसिंग ठाकूर, प्रमोद मानमोडे, अनिल जवादे, श्रीकांत तराळ होते. वेगळ्या विदर्भाच्या मागणीपत्रावर सुमारे १० हजार विदर्भवासींनी स्वाक्षरी केली आहे. रक्ताक्षरी करून अभियानाचा प्रारंभ करणारे ॲड. अणे यांनी रविवारी पुन्हा रक्ताक्षरी करीत अभियानाचा समारोप केला.

वेतन आणि कर्जाचे हप्ते फेडण्यात राज्याचा ६० टक्के खर्च होत आहे. उर्वरित ४० टक्‍क्‍यांतून अर्धा निधी जीएसटी स्वरूपात केंद्राला जात आहे. यामुळे महाराष्ट्रासह सर्वच राज्यांचे पैसे संपले असून, आता निधीसाठी दिल्ली दरबारी चपला झिजवाव्या लागत आहेत. म्हणूनच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही सरकारच्या गोटात जाऊन बसल्याचा आरोप ॲड. अणे यांनी केला.

मोदी कुणाचेही ऐकत नाहीत, असे खुद्द भाजपचे खासदारच सांगत आहेत. अशा स्थितीत १० हजार रक्तस्वाक्षऱ्या बघून मोदींचे काळीज पिळून निघेल याची शक्‍यता नाही. त्यामुळे दिल्लीत धडकूनच विदर्भाची मागणी रेटावी लागेल. शेतकरी आत्महत्येचा आकडा ३३ हजारांवरून ६६ हजारांवर गेला तरी त्यांना बुलेट ट्रेनच आणायची आहे. अच्छे दिन येणार नाही, हे लोकांना  कळले आहे. आता भाजपला प्रत्येक निवडणुकीत हरवावे लागेल. भाजप आणि काँगेस आजचे एक क्रमांकाचे शत्रू असून, विदर्भवादी नेत्यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

नवराज्य निर्माण समितीचे संमेलन नागपुरात
छोट्या राज्यांसाठी देशभरात मागणी होत आहे. वेगळ्या राज्याची मागणी करणाऱ्या महासंघाचे संमेलन १४ व १५ ऑक्‍टोबरला नागपुरात आयोजित केले आहे. छोट्या राज्यांची मागणी करणाऱ्या संघटनांचे देशभरातील प्रतिनिधी या संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती ॲड. अणे यांनी दिली.

देशात कायदेबाह्य घडामोडी
राज्याचा महाधिवक्ता म्हणून गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्यावर उच्च व सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. परंतु, आज गोवंशासाठी माणसं मारली जात आहेत. विरोधी मतं मांडणाऱ्यांची राजरोसपणे हेटाळणीपासून मारण्यापर्यंत प्रकरण जात आहे. देशात अशा अनेक कायदेबाह्य घटना घडत आहेत. उन्मत्त कार्यकर्ते आणि पागल झालेले हे सरकार रोज लोक बघत असल्याचे ॲड. अणे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com