संघाचे कट्टरच राहतील भाजपमध्ये - अजित पवार

संघाचे कट्टरच राहतील भाजपमध्ये - अजित पवार

नागपूर - भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी नागपुरातील गुन्हेगारी, भारनियमनाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचे भांडवल करीत माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी भविष्यात या पक्षात संघाचे कट्टर समर्थकच राहतील, असा टोला हाणला. नाना पटोले यांनी चूक कबूल केली, आता देशमुखही चूक दुरुस्तीच्या मार्गावर असल्याचे ते म्हणाले.

सत्ताधाऱ्यांतर्फे डॉ. अनिल बोंडे यांनी मांडलेल्या ठरावावर चर्चेदरम्यान अजित पवार बोलत होते. या वेळी पवार यांनी आशीष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र वाचून दाखविताना विदर्भाची तसेच नागपुरातील स्थितीकडे लक्ष वेधलेच. शिवाय भाजपवर शरसंधान साधण्याची संधीही साधली. यानिमित्त सत्ताधाऱ्यांविरोधात स्वपक्षीयांच्याच रोषाला सुरुवात झाल्याचे नमूद करीत भविष्यात केवळ जनसंघ, संघाचेच लोक राहतील, असे नमूद केले. सरकारच्या कर्जमाफीच्या योजनेचे धिंडवडे काढत शेतकऱ्यांशी कुणी बनवेगिरी करीत असेल तर त्याला अभय देण्याची गरज नाही, असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांवरही आसूड उगारला. ऊर्जा मंत्रालयाची आर्थिक स्थिती दयनीय असून यात लक्ष न घातल्यास संपूर्ण विद्युत व्यवस्था कोसळेल, असा इशारा त्यांनी ऊर्जामंत्र्यांनाही दिला. अनेक भागात शेतकऱ्यांना वीज मिळत नसल्याचे नमूद करीत त्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचा आरोपही केला. केवळ अधिकाऱ्यांचे ऐकून राज्य चालविता येत नाही, स्वतःत पण धमक हवी, असेही ते म्हणाले. कापूस, धान उतादकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस उत्पादकांना एकरी २५ हजार, धान उत्पादकांना एकरी १० हजार  मदत दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कर्जमाफीचे पैसे जमा झाले नाही, मात्र, मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यात येत आहे. त्यात फक्त मुख्यमंत्र्यांचाच फोटो असून गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री, कृषिमंत्र्यांना डावलण्यात आले, असे ताशेरेही त्यांनी ओढले. विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनीही २०१५ मध्ये दुष्काळस्थितीवरून मदतीची  घोषणा केली. परंतु, सरकारने अंमलबजावणी केली नसल्याचे सांगितले. किती घोषणा  ऐकायच्या? असा सवाल त्यांनी उपस्थित करीत सरकारचे वाभाडे काढले.

या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे, धैर्यशील पाटील, शशिकांत शिंदे, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, अब्दुल सत्तार, शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, सुभाष साबणे, सपचे अबू आझमी यांनीही भाग घेतला.

मिहानमध्ये रिलायन्स, रामदेवबाबांचेच भले
विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही यावेळी सरकारवर चौफेर हल्ला केला. मिहानमध्ये रोजगारात वाढ नाही, कुठलीही प्रगती नाही, येथे केवळ रिलायन्स व रामदेवबाबांचे भले झाल्याचा आरोप त्यांनी केला. या सरकारवर ‘कॅग’ने मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढले. नको तिथे पैसा खर्च केला, याबाबतही चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.  

रेड्डीचेही देशमुखांच्या पावलावर पाऊल
‘आपला कुठला पक्ष नाही, आपला शेतकरी हाच पक्ष’ असे नमूद करीत रामटेकचे भाजप आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनीही आशीष देशमुखांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचे संकेत दिले. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या योजनांना अधिकारी गती देत नसल्याने शेतकरी आत्महत्या होत असल्याचे नमूद करीत त्यांनी प्रशासनावर पकड नसल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला. शेतकऱ्यांना वीज, पाणी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com