चायनीज राखी बांधताना सैनिकांचे बलिदान आठवा - मुकुल कानिटकर

सिव्हिल लाइन्स - भोसला मिलिटरी स्कूलच्या वतीने अठरावा कारगिल विजय दिन बुधवारी  साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी काढलेला विजय मार्च.
सिव्हिल लाइन्स - भोसला मिलिटरी स्कूलच्या वतीने अठरावा कारगिल विजय दिन बुधवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी काढलेला विजय मार्च.

नागपूर - सिक्कीममध्ये सैनिक चीनचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहेत. तुमच्या भावाच्या हातावर बांधलेली राखी आपल्या सैनिकांच्या छातीवर गोळी झाडणाऱ्या देशातून आलेली असेल, एवढी बाब रक्षाबंधनाला लक्षात ठेवा. भावाला चायनीज राखी बांधताना सैनिकांचे  बलिदान आठवा, असे आवाहन भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संयोजन सचिव मुकुल कानिटकर यांनी बहिणींना केले.

भोसला मिलिटरी स्कूलच्या वतीने सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात १८ व्या कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्‌ प्रमुख पाहुणे होते. कमांडंट जे. एस. भंडारी, सीएचएमएई सोसायटीचे सचिव दिलीप चव्हाण, तरुण पटेल, भोसला मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, मुख्याध्यापक अजय शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

कारगिलचे युद्ध सुरू होते, त्यावेळी मी राजस्थानमध्ये होतो. युद्धात शहीद झालेल्या राजस्थानच्या १८ सैनिकांच्या घरी गेलो. त्यावेळी एका सैनिकाच्या दहा वर्षांच्या मुलाला विचारले, ‘मोठेपणी काय होणार?’. त्यावर तो म्हणाला, मी सैन्यात जाणार आणि बाबांचे अर्धवट काम पूर्ण करणार. कारण, कारगिलवर समाधानी राहून चालणार नाही. अजून पाकव्याप्त काश्‍मीर बाकी आहे, असे मुकुल कानिटकर म्हणाले.

वीरता केवळ सैनिकांमध्ये राहून चालणार नाही, ती प्रत्येकात असली पाहिजे. सर्व शाळांमध्ये दोन वर्षे सैनिकी शिक्षण अनिवार्य करावे, यासाठी भारतीय शिक्षण मंडळ प्रयत्न करीत असल्याचेही मुकुल कानिटकर म्हणाले. भारताचा इतिहास गुलामीचा नसून संघर्षाचा आहे, पण आपल्या अभ्यासक्रमांमध्ये जिथे आपला पराभव झाला, ते पानिपतचे युद्ध शिकविले जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. डॉ. के. व्यंकटेशम्‌ म्हणाले, ‘सैनिक आणि नागरिकांना जोडण्याचे काम भोसला मिलिटरी स्कूल करीत आहे. अशा उपक्रमांमधून नक्कीच देशातील नागरिकांमध्ये देशभक्ती जागृत होत असते.’

विद्यार्थ्यांचा ‘विजय मार्च’
कारगिल विजय दिनानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा विजय मार्च काढण्यात  आला. रामनगर चौक, लक्ष्मीभुवन चौक, कॉफी हाउस चौक, लॉ कॉलेज चौक या मार्गाने हा मार्च देशपांडे सभागृहात दाखल झाला. त्यानंतर कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com