नागपूर - "संमेलनाध्यक्ष निवडणुकीच्या संदर्भातील मक्तेदारीला आता लोक कंटाळले आहेत. त्यामुळेच गठ्ठा मतदानापेक्षा गुणवत्तेची चर्चा होऊ लागली आहे. या अर्थाने यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरेल,' असे भाकीत सुप्रसिद्ध लेखक- कथाकार राजन खान यांनी आज (रविवार) येथे व्यक्त केले. साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून ते शर्यतीत आहेत. त्यानिमित्ताने नागपुरातील मतदारांच्या भेटीला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
'मतदारांच्या, संस्थाचालकांच्या भेटीगाठी, पत्रव्यवहार याची खरेतर गरज नाही; पण गेल्या वीस वर्षांमध्ये ही पद्धत प्रचलित झाली आहे आणि आत्ता अस्तित्वात असलेली ही प्रक्रिया स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. पण, भविष्यात तेही बदलेल, अशी आशा आहे,'' असेही ते म्हणाले. अनेक दिग्गज साहित्यिक अध्यक्षपदाची निवडणूक का लढवत नाहीत, या प्रश्नावर ते म्हणाले, ""साहित्य संमेलनाचे स्थळ असो वा अध्यक्षपदाची निवडणूक, या प्रक्रियेतील आदेशपद्धतीबाबत दिग्गज साहित्यिकांच्या मनात किळस निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे, तर गेली अनेक वर्षे गटातटांचे राजकारण होत आल्याने संमेलनांच्या अध्यक्षांकडे लोक कुचेष्टेने बघायला लागले आहेत. पण, मला यातून पलायन करायचे नाही. कारण ही साहित्यसृष्टी माझी आहे. त्यामुळे किळसवाणे वातावरण दुरुस्त करण्याचीही जबाबदारी माझीच आहे.'' या वातावरणामुळेच महिला लेखक संमेलनाच्या अध्यक्ष होऊ शकल्या नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
|