शाळकरी मुले अमली पदार्थांच्या विळख्यात

शाळकरी मुले अमली पदार्थांच्या विळख्यात

नागपूर - खेळणे, बागडणे, मस्ती करण्याच्या लहानग्या वयातील शाळकरी मुलांना  अमली पदार्थांचे आकर्षण जडणे आणि त्याचे सेवन करताना आढळणे पालक आणि  शिक्षकांसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.

व्यसनवाढीच्या आकर्षणाला जबाबदार कोण? या प्रश्‍नांनी सर्वांनाच गोंधळात टाकले असताना नामांकित शाळेतील तीन मुले चक्क वर्गात हुक्का पिताना आढळणे, एक शाळेतील विद्यार्थी वर्गमैत्रिणीसोबत सिगारेट ओढताना शिक्षकाच्या नजरेस पडणे या घटनांमुळे गाभीर्य अधिकच वाढले आहे. यामुळे नेमके चुकतेय कोणाचे हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

दिल्लीतील रेयान स्कूलमधील विद्यार्थी प्रद्मुम्न याच्या हत्याकांडाची चर्चा भारतभर होत आहे. त्यामुळे पालक पाल्यांच्या सुरक्षिततेविषयी चिंतित आहेत. त्यातच नागपुरातील एका नामांकित शाळेतील तीन विद्यार्थी शाळेच्या मधल्या सुटीत वर्गात हुक्‍का पिताना वर्गशिक्षकांना आढळले.

मुख्याध्यापकाने त्यांच्या पालकांना बोलावून प्रकार कानावर टाकला आणि त्यांना तीन दिवसांसाठी शाळेतून निलंबितही केले. मात्र, ही शिक्षा पुरेशी का? त्या मुलांसारखे आणखी कितीतरी मुले अमली पदार्थाच्या विळख्यात आहेत. अशा घटनांसाठी जबाबदार कोण? असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

पालकांनी मुलांसोबत मैत्रीपूर्ण नाते ठेवावे. त्यामुळे अशा घटनांवर अंकुश ठेवता येईल. मात्र, आताच्या पालकांकडे मुलांसाठी वेळ नाही. त्यामुळे मुलांचे पाय नको त्या वयात कळत-नकळत वाममार्गाकडे वळतात. ही बाब पालकांसाठी चिंतेची आहे. दुसऱ्या एका घटनेत, एका शाळेतील विद्यार्थी आपल्या वर्गमैत्रिणीसोबत शाळेच्या परिसरात सिगारेट ओढताना वर्गशिक्षकाला आढळला. शिक्षकाने मुलांच्या आईवडिलांच्या कानावर हा प्रकार घातला. पालकांनीही मुलांची चांगलीच कानउघडणी केली. मात्र, या घटना घडण्यासाठी कोण जबाबदार आहे? शाळा परिसरात अशा घटना वारंवार कशा घडतात? शाळेची जबाबदारी काय?, पालकांचे चुकते कुठे? असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

कुतूहल आणि जिज्ञासेतून असे कृत्य मुले करतात. बाराव्या वर्षांपासून शरीरात रासायनिक बदल होत असतात. मुलांवर पालकांनी किंवा शिक्षकांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे. त्यांचे समुपदेशन केल्यास त्यांच्यातील कुतूहल नष्ट होईल. सिगारेट ही व्यसनाकडे वळण्याची पहिली पायरी आहे.  ते जर चांगले वाटले किंवा आवडले तर अमली पदार्थाच्या सेवनाची सवय लागू शकते. पालकांनी घरातील मुलांची वागणूक, चिडचिड किंवा स्वभावात होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवावे. मुलांच्या अचानक स्कूलबॅग, मोबाईल किंवा वह्या तपासायला हव्यात. 
- डॉ. राजा आकाश, सुप्रसिद्ध कन्सल्टंट, सायकोलॉजिस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com