नागपूर - राज्य सरकारने सर्व संवेदना गमावल्या असून, फडणवीस सरकार आंधळे व बहिरे असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
येत्या 12 डिसेंबरला नागपूरला राज्य सरकार विरोधात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विधिमंडळावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तटकरे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. सकाळी त्यांनी पश्चिम विदर्भातील जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली, तसेच दुपारी पूर्व विदर्भातील जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक घेतली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी फडणवीस सरकारवर हल्ला चढविला. फडणवीस सरकार हे अप्रामाणिक असून लोकांच्या संवेदनांशी कोणताही संबंध उरला नाही. कर्जमाफी योजनेवरून या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ पाच हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. खोट्या जाहिराती देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. नागपूरसह राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते असूनही पोलिस खात्यावर त्यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. पोलिसच सराईत गुन्हेगारांसारखे खून करीत असल्याचे राज्यातील जनतेला पहिल्यांदा अनुभवाला येत आहे, अशी टीका त्यांनी केली.
या वेळी माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री रमेश बंग उपस्थित होते.
|