नागपूर - नाणार प्रकल्प प्रकरणी मुख्यमंत्री नागरिकांशी चर्चा करण्याची भाषा करीत आहे. चर्चा नको हा प्रकल्प रद्द करा, अशी मागणी शिवसेना आमदारांनी करीत विभानभवन परिसरात घोषणा देत मोर्चाही काढला.
नाणार प्रकल्पावर चर्चेवरून शिवसेनेनी घातलेल्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज दुपारीच दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. नाणार विरोधात घोषणा देत शिवसेना आमदार सभागृहाच्या बाहेर पडले.
नाणार जाणार, विषणकारी प्रकल्प रद्द करा, चर्चा नको, प्रकल्प रद्द करा, अशा घोषणाही त्यांनी दिल्या. त्यानंतर पक्ष कार्यालयातून परिसरात मोर्चा काढत घोषणा दिल्या. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजन साळवी व सुनील प्रभू म्हणाले, कोकणाचे सौंदर्य आणि निसर्ग नष्ट करणारा हा प्रकल्प आहे. यामुळे येथील शेतकरी, मच्छीमार उद्ध्वस्त होणार असून आंबाही नष्ट होणार आहे. 16 गावातील नागरिक प्रकल्पामुळे उद्ध्वस्त होणार आहे. जैतापूरचा प्रकल्प दोन किलोमीटरवर आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर नष्ट होणार आहे. या प्रकल्पाच्या विरोधात लोक मोर्चा घेऊन आले आहे. लोकांच्या बाजूने शिवसेना आहे. लोकांना प्रकल्प नको असल्याने हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे. सभागृहात यावर चर्चा नकारल्यामुळे शिवसेनेचे सदस्य राजन साळवी, प्रताप सरनाईक, सदानंद चव्हाण यांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकल्प रद्द करण्यासाठी शिवसेनेचेही काहीही करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
|