अकोला - खादी व ग्रामउद्योग मंडळाच्या दिनदर्शिकेवर महात्मा गांधी यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महात्मा गांधी यांच्यापेक्षाही मोठे भासवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत केला.
अकोला महापालिका आणि अमरावती विभागीय पदवीधर तदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी मोदी यांच्या कृतीवर टीका केली. मोदींनी चरखा हातात घेऊन महात्मा गांधी यांच्या जागी स्वतःचे छायाचित्र प्रकाशित करण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परवानगी घेतली काय? असा खोचक प्रश्नही उपस्थित केला. मोदी हे महात्मा गांधी यांच्यापेक्षा स्वतःला मोठे भासविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांची ही कृती त्यांच्यावरच उलटली असून, त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागतील, असे ते म्हणाले.
महात्मा गांधी यांना मानणारा मोठा वर्ग या देशात आहे. "आरएसएस'ने नथूराम गोडसे यांची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पुण्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांचे व प्रतिमांचे चौकाचौकांत पूजन झाले. त्यानंतर संघाला नथूराम गुंडाळून ठेवावा लागला, अशी आठवण त्यांनी सांगितली.
मोदी हुकूमशाहीकडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती ही हुकूमशाहीकडे वळणारी आहे. त्याला राजकीय पक्षांकडून विरोध होत असला, तरी हा विरोध जनतेतून झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.
"यूपी, पंजाबमध्ये लढणार
भारिप-बहुजन महासंघ हा पक्ष आता राज्याच्या सीमा ओलांडून उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणूक लढविणार आहे. तेथील स्थानिक समविचारी पक्षांसोबत आघाडी करून निवडणूक लढविणार असल्याची माहिती डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
|