नागपूर - महात्मा गांधी म्हणाले होते, खेड्याकडे चला... परंतु खेड्यातील चित्र आज भयावह आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसेवा आयुर्वेद वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे. गावखेड्यात आरोग्यसेवेचा कणा प्राथमिक आरोग्य, उपकेंद्र आहे. याशिवाय दुर्गम भागातील नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी "ऍलोपॅथी' आणि आयुर्वेदिक डॉक्टारांचे "फिरते पथक' आहे. मात्र, सरकारकडून अनावश्यक असल्याचे कारण पुढे करीत फिरत्या पथकासह काही आरोग्य संस्था बंद करण्याचा घाट घातला आहे. ही सेवा बंद झाल्यास ग्रामीण आरोग्याचा कणा मोडण्याची भीती आहे.
राज्यभरात प्राथमिक आरोग्य केंद्रांचे जाळे विणले जात आहे. काही आरोग्य केंद्रे थेट राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी जोडली गेली आहेत, तर काही जिल्हा परिषदेअंतर्गत आहेत. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नाहीत, त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात फिरत्या पथकातील डॉक्टर सेवा देतात. मनुष्यबळाची कमतरता असूनही गावखेड्यात फिरते पथक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामार्फत डॉक्टरांकडून सेवा दिली जात आहे.
एकीकडे ग्रामीण आरोग्य सांभाळण्यासाठी योजनांचा पाऊस पाडला जात असताना गरज नसल्याचे कारण पुढे करीत ऍलोपॅथी आणि आयुर्वेदिक फिरते पथक बंद करण्यामागे डॉक्टरांची संख्या कमी करण्याचा हा प्रकार असल्याची जोरदार चर्चा सार्वजनिक आरोग्य विभागात रंगली आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिस बोर्डाच्या अहवालानुसार राज्यात 100 गावांमागे 18 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 22 स्थानिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता आहे. 11 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात अवघी 1816 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. आयुर्वेदिक दवाखान्यांची संख्या 442 आहे आणि एकूण हेल्थ युनिट 172 आहेत, ही अपुरी सेवा असताना नागरिकांना गुणात्मक नसली तरी पुरेशी, प्रतिबंधात्मक व रोगनिवारक आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागात कंत्राटीवरील डॉक्टर पार पाडत आहेत.
जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र सक्षमपणे चालविणे हे आव्हान सार्वजनिक आरोग्य विभागाने निभावण्याची गरज असताना याअंतर्गत असलेले फिरते दवाखाने व काही अनावश्यक असल्याचे कारण सांगून आरोग्य संस्था बंद करण्याचे चुकीचे धोरण राबवण्यात येत आहे. ऍलोपॅथी दवाखान्यांची संख्या 85 आहे. यातील सर्वाधिक संख्या विदर्भात आहे. यांच्यावरही संक्रात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे या विभागात कंत्राटीवर सेवा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारी "आरोग्या'ची स्थिती
1816 - प्राथमिक आरोग्य केंद्रे
442 - आयुर्वेदिक दवाखाने
172 - हेल्थ युनिट
85 - ऍलोपॅथी दवाखाने
फिरती पथके बंद करण्याचा निर्णय आद्याप विचाराधीन आहे. राज्यात अनेक आरोग्य केंद्रांत "ओपीडी' कमी आहे, अशा ठिकाणी अनावश्यक मनुष्यबळ असते. काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक फिरते पथकही असते. असे प्रकार पुढे आले आहेत, यामुळे फिरते पथक किंवा संस्था बंद करण्याचे विचाराधीन आहे.
- डॉ. संजीव कांबळे, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई
|