नागपूर - संत तुकारामांच्या अभंगांना लिखित स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या संत जगनाडे महाराजांच्या नागपुरातील भव्य स्मारकाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. दोन वर्षांपूर्वी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताजी स्मारक आणि सदुंबरे महाराजांच्या समाधी स्थळाला धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप ही मागणी पूर्ण झालेली नाही.
तुकाराम महाराजांचे वंशज गोपाळबाबा मोरे यांनी "संताजी तेली बहु प्रेमळ, अभंग लिहीत बसे जवळ, धन्य त्याचे सबळ, संग सर्वकाळ तुक्याचा' असे संताजी महाराजांचे वर्णन केले आहे. भक्ती लीलामृत या ग्रंथात, संताजी तेली वैष्णववीर तसेच तुकारामांची गाथा संताजींच्या अथक परिश्रमांमुळेच जिवंत राहू शकली, असा स्पष्ट निर्वाळा महिपतीबुवा यांच्यापासून तर वि. ल. भावे यांच्यापर्यंत सर्वजण निखालसपणे देतात. तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संताजी महाराजांची स्वलिखित साहित्यसंपदा मोडी लिपीत आहे. ही साहित्यसंपदा मराठीमध्ये करण्याबाबत देखील साहित्यिकांनी ओरड केली. परंतु, सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संताजींचे साहित्य धूळखात पडले आहे. दुर्दैवाने त्यांनी रचलेले "शंकरदीपिका' आणि "तैलसिंधु' हे काव्यसंग्रह आज कुठेही उपलब्ध नाहीत. पण त्यांनी रचलेले "घाण्याचे अभंग' काही संख्येने उपलब्ध आहेत.
आर्ट गॅलरीचा विषयही मागे
संताजी स्मारकाप्रमाणेच संताजी आर्ट गॅलरीचा विषयदेखील मागे पडला आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली घोषणा हवेत विरल्याची भावना तेलीबांधव व्यक्त करीत आहे.
स्मारकाच्या आशा विरल्या
आजघडीला असलेल्या जगनाडे चौकातील पुतळ्यामागेच स्मारक होण्याची अपेक्षा समाजबांधवाना होती. मात्र, तेथे होत असलेल्या ट्रान्सपोर्ट प्लाझामुळे संताजी स्मारकाच्या आशा पूर्णत: लोप पावल्या आहेत.
|