नागपूर : शिवसेनेला गावागावांत पोहोचवण्याचे धनुष्य नागपूरचे नवे संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी उचलले असून, महापालिकेची निवडणूक स्वबळावर लाढण्याची घोषणा त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी महापालिकेतील डांबर घोटाळा व क्रॉंक्रिट रोडच्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधून त्यांनी भाजपवर निशाना साधला.
नागपूरचे संपर्क प्रमुख झाल्यानंतर प्रथमच तानाजी सावंत प्रथमच मंगळवारी नागपूरला आले. शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. डांबर घोटाळा करणाऱ्या कंत्राटदारास भाजपने कॉंक्रिट रोडचे काम दिल्याचा आरोप त्यांनी केला. 24 तास पाणी देण्याची घोषणा फोल ठरली. झोपडपट्ट्यांचाही विकास झाल्याचे दिसून येते नाही. भाजप फक्त घोषणा करणारा पक्ष आहे. कुठलेही प्रश्न त्यांना सोडवायचे नाही. फक्त जाहिरातींच्या माध्यमातून खोटी प्रसिद्धी करण्याचे एकमेव काम केले जात आहे. सत्तेतून पैसा कमावणे हा एकमेव अजेंडा भाजपचा असल्याचा आरोपही त्यांनी केला. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पराभूत होऊ, या भीतीने भाजपने दोन वॉर्डांचा प्रभाग चार वॉर्डांचा केला. यामुळे सामान्य व निष्ठावान कार्यकर्ते निवडणूक लढण्यापासून वंचित राहणार आहेत, असेही सावंत म्हणाले.
अडीच वर्षांपासून राज्यात भाजप सत्तेवर आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाही. शेतमालाला रास्त भाव दिले नाही. विरोधात असताना फक्त शेतकरी व सर्वसमान्य माणसांची सहानुभूती मिळविण्याचे काम भाजपने केले. सत्तेवर येतात भाजपला सर्वांचा विसर पडला.
आत भाजपचे नेते राजकारणापलीकडचे विषय बोलत नाही. मात्र, शिवसेना पूर्वी होती तशीच आजही. येणाऱ्या काळात यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त असल्याची ओळख पुसून टाकू, असा दावाही सावंत यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेत माजी खासदार प्रकाश जाधव, जिल्हाप्रमुख सतीश हरडे, नगरसेवक किशोर कुमेरिया, सूरज गोजे आदी उपस्थित होते.
आज शिवसैनिकांचा मेळावा
शिवसैनिकांचा मेळावा उद्या बुधवारी (ता. 11) दुपारी चारला शंकरनगर येथील साई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याच्या माध्यमातून संपर्कप्रमुख महापालिकेच्या प्रचाराचे नारळ फोडणार आहे.
|