शंकर चायरे यांचा मृतदेह  अखेर कुटुंबीयांच्या ताब्यात 

शंकर चायरे यांचा मृतदेह  अखेर कुटुंबीयांच्या ताब्यात 

यवतमाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हे नोंद होत नाहीत व मदतीचे ठोस आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाहीत, असा पवित्रा घाटंजी तालुक्‍यातील राजूरवाडी येथील ग्रामस्थांसह शेतकऱ्याच्या नातेवाइकांनी घेतला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांचा मृतदेह शवविच्छेदनगृहातच होता. मात्र, गुरुवारी (ता. 12) महसूल राज्यमंत्री संजय राठोड, माजी खासदार नाना पटोले, माजी आमदार विजया धोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी मध्यस्थी केल्याने नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला व पोलिस बंदोबस्तात राजूरवाडी येथे रवाना करण्यात आला. 

शंकर चायरे या शेतकऱ्याने मंगळवारी (ता. दहा) सकाळी काकाच्या शेतात विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली. या शेतकऱ्याने आत्महत्येस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून मृताच्या कुटुंबाला एक कोटीची मदत देण्याची मागणी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीसह नातेवाईक व ग्रामस्थांनी केली. मुख्यमंत्री आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्राही घेतला. त्यामुळे दोन दिवसांपासून मृतदेह शवविच्छेदनगृहातच होता. 

महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी शवविच्छेदनगृहात भेट दिली.

अधिष्ठाता व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर राजूरवाडी येथे भेट देऊन चायरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. मात्र, यथोचित आर्थिक मदत व मृताच्या एका मुलीस शासकीय सेवेत नोकरी देण्याची हमी घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, या भूमिकेवर चायरे कुटुंबीय ठाम होते. राज्यमंत्री राठोड यांनी मृत चायरे यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेतले. चायरे यांच्या मुलींचे शिक्षण, एका सदस्यास नोकरी, कुटुंबीयास आर्थिक मदत या सर्व बाबींचा शासनस्तरावर विचार करून कुटुंबीयांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मदन येरावार यांच्याशी संवाद साधून चायरे कुटुंबीयांच्या भावना त्यांच्यापर्यंत थेट पोहोचविल्या. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनीही चायरे कुटुंबीयांना सर्वतोपरी साहाय्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे यावेळी स्पष्ट केले. त्यावरून शासनाकडून सर्वतोपरी साहाय्य करण्याचा विश्‍वास राज्यमंत्री राठोड यांनी चायरे कुटुंबीयांना दिला. शवविच्छेदनास परवानगी द्यावी व चायरे यांच्या मृतदेहावर रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करावा, अशी विनंती राठोड यांनी चायरे कुटुंबीयांना केली. त्यानंतर चायरे कुटुंबीयांनी उपस्थित नातेवाईक व काही संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून मृतदेह ताब्यात घेण्यास होकार दिला. त्यानंतर यवतमाळ येथे शवविच्छेदन करून सायंकाळी पाच वाजता मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. मृतदेह पोलिस बंदोबस्तात रुग्णवाहिकेद्वारे राजूरवाडी येथे नेण्यात आला. तीन दिवसांनंतर आज गुरुवारी सायंकाळी सातदरम्यान मृतदेहावर राजूरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com