संस्थान विरोधातील शक्तींना कुणाचं पाठबळ?

shree gajanan maharaj shegaon
shree gajanan maharaj shegaon

शेगाव (बुलढाणा): विविध सेवा प्रकल्प राबवून आध्यत्मिक आणि सामाजिक कार्यात मोलाचं योगदान देत असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान विरोधात गेल्या काही दिवसांपासून मूठभर लोकांनी विरोध प्रदर्शन सुरू केले आहे. इतिहासात प्रथमच मोर्चे, सभा असे प्रकार होत आहेत. हा विषय संवेदनशील असतांना सुद्धा पोलिस अधिकारी अशा आंदोलनास परवानगी देत असल्याने या आंदोलनकर्त्यांना कुणाचं पाठबळ असा प्रश्न उपस्थित होतो.

शेगावची देशभर ओळख श्री गजानन महाराज संस्थानमुळे निर्माण झाली आहे. राज्य व देशातून दररोज भाविक संतनगरीत येतात. त्यामुळेच शेगाव व्यवसाय वृद्धी झाली. मार्केट वाढले. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सोयी सुविधा देण्यासाठी विकास आराखडा आला. त्यात रस्ते व इतर कामे झाली. रस्ता रुंदीकरण कामात काही व्यापारी लोकांची दुकानांची जागा कमी झाली. मंदिर परिसर मोकळा करण्यासाठी तेथील दुकाने खाली करून घेण्यात आली. काहींनी त्यास विरोध करत न्यायालयात धाव घेतली. पुनर्वसन कामात काही लोकांची नाराजी आली. हे सर्व होत असताना मंदीर प्रशासन आपल्यावर अन्याय करत असल्याची भावना निर्माण झालेले लोक विरोधी भूमिका घेत आहेत. मात्र यात भाविक वेठीस धरला जात आहे. विदर्भाची कन्याकुमारी अशी ओळख देणाऱ्या आंनद सागर प्रकल्पाबाबतही तक्रारी केल्या गेल्या आहेत. त्यामुळे आनंद सागराची वेळ कमी करण्यात आली आहे. आतील खेळ व इतर मनोरंजन बंद करण्यात आले. सद्या सुट्या असल्याने लाखो भाविकांची शेगावला गर्दी असते मात्र आनंद सागर मधील पर्यटनाचा आंनद घेता येत नसल्याने भाविकांची निराशा होत आहे.

पर्यटन संख्या रोडावली असल्याने  व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे. आनंद सागर परिसरात नव्याने हॉटेल व्यवसाय सुरू केलेल्या एका व्यक्तीने सांगितले की मी कोट्यवधी कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला मात्र आता भावीक कमी असल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे.

दरम्यान, मंदिर व्यवस्थापनाचे निर्णय काही लोकांना आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरत असल्याने त्यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे. इथे मंदीरची बाजू घेण्याचा प्रश्न नाही मात्र भाविकांच्या सोयी सुविधेचा विचार करता हा विषय सामोपचाराने हाताळणे गरजेचे आहे. शेवटी मंदिर हीच शेगावची ओळख आहे. वान पाणी पुरवठा योजनेची लोकवर्गणी व इतर लोकहिताची कामे संस्थानेच केली आहेत. आणखी मोठे प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून येणार असल्याचे कळते.  मंदिर विरोधात काही लोकांनी उभे केलेले हे आंदोलन त्यात अडथळा ठरत आहे. त्याला मिळणार पाठबळ कुणाचं हा प्रश्न चर्चेत आला आहे.

आदर्श संस्थान
सेवा, शिस्त आणि स्वच्छता यासाठी श्री गजानन महाराज संस्थान एक आदर्श आहे. भाविकांची कोणतीही लूट येथे होत नाही. समाजहिताचे विविध 42 सेवा प्रकल्प हे संस्थान राबवित आहे.एखादी संस्था इतके  चांगले काम करत असेल तर त्यांना इतका टोकाचा विरोध करणे कितपत योग्य आहे? याचा विचार होणे गरजेचे आहे.

पालकमंत्री, मुख्यमंत्री यांचे मौन?
शेगाव नगर पालिका व मतदार संघात भाजपाची सत्ता आहे. मंदिर विरोधी आंदोलनात काही भाजपा पदाधिकारी प्रत्यक्ष सहभाग घेत आहेत. आमदार डॉ. संजय कुटे यांचे काही निकटवर्तीय त्यात आहेत. ही सर्व बाब लक्षात घेता वरीष्ठ पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी या प्रकरणात लक्ष देवून आंदोलक व मंदिर यात तोडगा काढणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com