एटापल्ली, (जि. गडचिरोली) - चुकीच्या रूढी, परंपरा व अंधश्रद्धा यामुळे आदिवासी समाजाचे अधःपतन झाले आहे. त्यामुळे यापुढे जुन्या चालीरिती न पाळण्याचा ठराव घेऊन एटापल्लीसह पाच तालुक्यांतील ग्रामसभांनी सामूहिक शपथ घेतली. या वेळी त्या संदर्भातील ठरावाचे जाहीर वाचन करण्यात आले.
अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड व एटापल्ली अशा पाच तालुक्यांतील ग्रामसभा प्रतिनिधी मंडळ सभा नुकतीच पार पडली. या वेळी गोंड, माडिया व इतर आदिवासी समाज यापुढे सामाजिक रूढी, परंपरांचे पालन, पूजन तसेच लग्न व श्राद्ध विधी करणार नाही, अशी शपथ घेण्यात आली. गोंडी धर्म परंपरा आदिवासी समाज रचनेत तंतोतंत बसत आहे. त्यामुळे इतर धर्मातील रूढी, परंपरा स्वीकारण्याची गरज नसल्याचे ग्रामसभा प्रतिनिधी ऍड. लालसू नोगोटी यांनी या वेळी सांगितले.
अंत्यविधी व श्राद्ध याबाबतही आदिवासी समाजाने निसर्गपूजन व नैसर्गिक विधीचेच पालन केले पाहिजे, असे मत ग्रामसभा प्रतिनिधी सैनू गोटा यांनी व्यक्त केले.
अंधश्रद्धेचा पगडा
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यातील अनेक गावांत आजही आरोग्याच्या पुरेशा सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे महिलांचे बाळंतपण, कुपोषण तसेच विविध प्रकारचे आजार दुरुस्त करण्यासाठी मांत्रिक व गावपुजाऱ्यांची मदत घेतली जाते. गेल्या आठवड्यातच भामरागडमधील नारगुंडा गावात जादूटोण्याच्या संशयावरून एकाची हत्या झाली होती. नरबळीचे प्रकारही नक्षलग्रस्त भागात घडले आहेत.
|