जलस्रोत असूनही ग्रामस्‍थ तहानलेले

अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा : वसाळी गावाला हातपंप आणि खाजगी बोअरवेलवर अवलंबून
विहीरीतील पाण्याचा उपसा होत नसल्‍याने घाण झालेले पाणी. हातपंप.
विहीरीतील पाण्याचा उपसा होत नसल्‍याने घाण झालेले पाणी. हातपंप.Sakal

संग्रामपूर - गावात पाण्याचे स्रोत मुबलक असताना निव्वळ शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्क्रियपणा व बेजबाबदारपणामुळे तालुक्यातील आदिवासी वसाळी (जुनी) गावात १७ वर्ष होऊन ही घरात पाणी गेलेले नाही. अशी भीषणता असताना गावात कोट्यावधींच्या योजना राबविल्याचे शासन दप्तरी रेकॉर्ड आहे. इतकेच नाही तर महाजल योजनेतून भली मोठी विहीर पाण्याने भरलेली आहे. या विहिरीतून उपसाच होत नसल्याने पाण्यावर तरंग तयार झाल्याने या पाण्याची स्वच्‍छता धोक्यात आल्याची दिसत आहे. विहीर खोदून बांधून असताना पाण्याच्या टाकीत अद्याप पाणी गेले नाही. योजना राबवून पैसा आणि मधातच मुरत असल्याने आदिवासी बांधवाना नळाच्या पाण्याची प्रतीक्षा कायमच आहे. सद्यस्थितीत गावातील हातपंप आणि खाजगी बोअरवेल वरून आदिवासी तहान भागवित आहेत. पाणी मुबलक असतांना कृत्रिम पाणी टंचाईचा हा भाग म्हणावा का? जलस्वराज ,महाजल योजना झाल्यावर जलजीवन मिशन आणि त्या नंतर ओटीएसपी अशा योजना या गावाच्या नावावर खपवल्या जात असल्याचे वास्तव चौकशी अंती समोर आलेशिवाय राहणार नाही. गाव उंचीवर असल्याने वान धरण १४० गाव पाणीपुरवठा योजनेतून तांत्रिक अडचणीमुळे ही गावे वगळण्यात आली.

शुद्ध आणि स्वच्छ जल म्हणजे जीवन असे ब्रीद घेऊन शासन स्तरावरुन ग्रामीण पाणी पुरवठा योजना गाव पातळीवर राबविल्या जात आहेत. यामध्ये ज्या गावात मुबलक पाणी आहे. अशा ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित असावी असेही जलजीवन मिशनमध्ये नमूद आहे. याला आदिवासी भाग अपवाद म्हणावा का ? असा प्रश्न वसाळी गावाच्या योजनांवरून निर्माण होत आहे. या गावात आजही बोअरवेल आणि हातपंपचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांचा १७ वर्षाच्या कार्यकाळात भडीमार असताना गावातील आणि घरातील नळाच्या तोटीला पाण्याची वानवा दिसत आहे. याला जबाबदार असलेल्या यंत्रणेला आणि मनमानी पणाने वागणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांना जाब विचारल्या जाईल का असा सवाल आदिवासी नागरिक करीत आहेत.

केवळ पाईपलाईन, पाण्याचा ठेंब नाही

जुनी आणि नवी वसाळी या दोन्ही ठिकाणी भल्या मोठ्या विहिरी आहेत. त्यातून पाईप लाईनचे काम ही झालेले आहे. मात्र, या पाईप लाईन मधून २००५ पासून पाण्याचा थेंब ही पुरवठा झाला नाही. आजच्या घडीला पाईपलाईन फुटलेली असून, विहिरीच्या बाजूने काटेरी झुडुपही वाढली आहेत. जुनी वसाळी येथे सोलरवर चालणारे बोअरवेल ही आहे. त्या मधून ही पाईप लाईन टाकून गावात पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न यंत्रणेकडून झाले नसल्याचे आदिवासीनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com