यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणार 

yashwant sinha
yashwant sinha

अकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून मुक्ती हवी अाहे. ते अाता २०२२ पर्यंत थांबायला तयार नाहीत. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस अशा सर्वच पिकांचे भाव पडले अाहेत. नाफेडमार्फत हमीभावाने शेतीमाल खरेदी होत आहे, मात्र त्यासाठी काही क्विंटलची मर्यादा घालण्यात अाली आहे. वास्तविक सरकारने शेतकऱ्यांचा सर्व शेतीमाल योग्यभावाने घेण्याची हमी द्यायला हवी. नाफेडने तातडीने अापला निर्णय बदलला पाहिजे. अन्यथा, अकोल्यापासूनच या विरोधात देशभर अावाज उठविला जाईल अाणि अापण या लढ्यात सहभागी होऊ, असा इशारा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी (ता. १५) सरकारला दिला. 

शेतकरी जागर मंचाने रविवारी अकोला येथे श्री. सिन्हा यांचे व्याख्यान अायोजित केले होते. या वेळी बोलताना सिन्हा यांनी देशात नोटाबंदी फसल्याचे सांगत फसलेल्या गोष्टींवर चर्चा होत नसते, असे सूचक विधान करीत पुन्हा एकदा सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभे केले. 

सिन्हा म्हणाले, की सप्टेंबर महिन्यात मी एका इंग्रजी वर्तमानपत्रात केवळ १२०० शब्दांचा एक लेख लिहिला अाणि देशभरात वेगळे वातावरण तयार झाले. या लेखात मांडलेली मते ही देशातील सर्व जनतेच्या मनातील असल्याने मला सर्वत्र अनुकूल असे संदेश मिळू लागले. सध्या देशातील शेतकरी, व्यापारी, तरुण, कष्टकरी असे सर्वजण विविध अडचणींना सामोरे जात अाहेत. त्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करून कुठलेही सरकार चालविले जाऊ शकत नाही. उलट त्या समस्या सोडविणारे शासन चांगले समजले जाते, असा अप्रत्यक्ष टोला अापल्याच पक्षाच्या सरकारला माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी लावला. जीएसटी कायदा झाल्यापासून छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक समस्याग्रस्त झाले अाहेत. दबाव वाढल्याने अाता सरकारने काही बदल केले. मात्र ते सुद्धा सदोष असल्याचे ते म्हणाले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदीश मुरुमकार होते. या वेळी व्यासपीठावर शेतकरी जागर मंचाचे मनोज तायडे, प्रशांत गावंडे, यशवंत सिन्हा यांच्या पत्नी श्रीमती सिन्हा व इतर उपस्थित होते. प्रशांत गावंडे यांनी प्रास्ताविकात शेतकरी जागर मंचाची भूमिका मांडली. 

नोटाबंदी पूर्णपणे फसली 
सरकारने गेल्या काळात केलेली नोटाबंदी पूर्णपणे फसली. त्याबाबत काय बोलायचे, असा प्रश्न करीत नोटाबंदीचे परिणाम वाईट अाहेत. सर्वच जण त्यात भरडले गेल्याचे सिन्हा म्हणाले. केवळ अाकडेवारी दाखवून देशातील समस्या सुटणार नाहीत. जीएसटी लावण्यापूर्वी व नंतर एवढी विक्री झाली, असे म्हणणे योग्य होत नाही. उलट उत्पादन किती झाले त्यावर तुम्ही विकासाची गोष्ट करू शकता. विरोधात असताना अाम्हीच सरकारच्या करविषयक धोरणांवर टीका करीत होतो. अाजची परिस्थिती पाहिली तर अापल्या जवळ शब्दच नाहीत, असे सिन्हा म्हणाले. 

माजी केंद्रीय अर्थमंत्री म्हणाले 
-सर्व शेतीमाल योग्य भावाने घेण्याची हमी हवी 
-शेतकरी, व्यापारी, युवक, कष्टकरी अडचणीत 
-नोटाबंदीत शेतकऱ्यांसह सर्वजण भरडले गेले 
-शेतकरी आत्महत्यांना आपण सर्वच जबाबदार 
-समस्या सोडविणारे सरकार चांगले असते 
-जीएसटी अद्यापही सदोष, सुधारणा अपेक्षित 

अापण ज्या झारखंडमधून येतो त्या प्रदेशात पूर्वी शेतकरी अात्महत्या करीत नव्हता. अाता तेथे अात्महत्या होत अाहेत. महाराष्ट्रातील विदर्भ तर देशातच नव्हे जगात शेतकरी अात्महत्यांसाठी अोळखला जातोय, ही दु:खद बाब आहे. अापण अद्याप शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो नाही हेच सत्य आहे. 
-यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय अर्थमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com