कीटकनाशक बाधाप्रकरणात 5 कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल

कीटकनाशक बाधाप्रकरणात 5 कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल

यवतमाळ : कृषी कार्यालयाकडून प्रमाणित न करता कीटकनाशक विक्री करणार्‍या जिल्ह्यातील पाच कृषी केंद्र चालकांविरुद्ध कृषी विभागाने शनिवारी (ता. सात) रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंदविले आहेत. यात कळंब एक, दारव्हा दोन व यवतमाळातील दोन कृषी केंद्र संचालकांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यवतमाळ शहरातील दोन कृषी केंद्रांवर शनिवारी (ता. सात) वडगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी (ता. चार) कृषी केंद्राची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने दत्त चौकातील कृषी वैभव व कृषी प्रगती केंद्रांची झाडाझडती घेतली. त्यात परवाना अधिकार्‍यांची परवानगी नसताना कीटकनाशकांची विक्री होत असल्याची बाब समोर आली. त्यानुसार वडगाव रोड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

याप्रकरणी कृषी वैभवचे दिलीप चिंतावार, कृषी प्रगतीचे दिलीप बोगावार यांच्याविरुद्घ कीटकनाशक कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले. पथकात उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी एस. ए. भवरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजेंद्र घोंगडे यांचा समावेश होता. कृषी केंद्राची तपासणी होत असल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील कृषी केंद्र बंद ठेवण्यात आल्याने तपासणीत अडथळा निर्माण होत असल्याची माहिती पथकातील सूत्रांनी दिली. तर, कळंब तालुक्यातील सावरगाव येथील कृषी केंद्र चालकाविरुद्ध कळंब पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे कृषी केंद्रचालकांचे धाबे दणाणले आहे. शेतात फवारणी करताना तालुक्यातील 19 पेक्षा जास्त शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. यात कळंब येथील देवीदास मडावी, तर सावरगाव येथील गजानन फुलमाळी या दोघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तालुक्यात एक चौकशी समिती गठित केली. या समितीत तहसीलदार रणजित भोसले, तालुका कृषी अधिकारी पाठक, कृषी अधिकारी किशोर अंबरकर आदी अधिकार्‍यांचा समावेश आहे.

या समितीने शनिवारी (ता. 7) सावरगाव येथील जलराम कृृषीकेंद्र चालक संजय राजा यांची चौकशी केली. या चौकशीत त्यांनी कृषी विभागाकडून प्रमाणित न करता कीटकनाशकाची विक्री केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कृषी अधिकारी किशोर अंबरकर यांनी कळंब पोलिसांत तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून कळंब पोलिसांनी संशयित संजय राजा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस पीएसआय राजकिरण मडावी करीत आहे. तर दारव्हा तालुक्यात दारव्हा येथे व लाडखेड पोलिस ठाण्यातही गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. दारव्हा येथील प्रवीण प्रभाकर भेलोंडे या कृषी केंद्र चालकावर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. याप्रकरणी पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजीव शिंदे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. लाडखेड पोलिस ठाण्यात अंकिता अ‍ॅग्रो एजन्सीचे प्रीतम सुरेशचंद्र राठी यांच्याविरुद्घ गुन्हे नोंद करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com