वर्षभर चित्रपट सृष्टीच्या झगमगाटात वावरत असताना तेथील आनंद आणि वारीतील आनंद यात मोठा फरक आहे. वारीतील आनंद आयुष्यात कधीही न विसरता येणारा असतो...
प्रत्येकाचे जीवन ही एक प्रकारची वारीच आहे. लहानपणी आई, वैवाहिक जीवनामध्ये पत्नीसमवेत; तर वृद्धापकाळात मुलांबरोबरचे जीवन ही एक प्रकारची वारीच आहे. ही प्रापंचिक वारी आहे. पंढरीची वारी ही पारमार्थिक वारी आहे. असे म्हटले जाते की, संपूर्ण आयुष्यभराची आपली लौकिक वारी आणि 20 दिवसांची पंढरीची वारी ही सारखीच आहे. इतके तिचे अपूर्व माहात्म्य आहे. या वारीमध्ये नामस्मरणाबरोबर ऊन, वारा, पाऊस यामुळे निसर्गही अनुभवता येतो. वारीमध्ये नकारात्मक विचार बाजूला पडतात. दुःखाची जागा सुख घेते. या वारीमध्ये अंतर्मनाचे शुद्धीकरण होते. वारीत चालताना प्रत्येक जण विठ्ठलाचे प्रतीक असतो, तर महिलांमध्ये रुक्मिणी माता दिसते. सांसारिक दुःखं वारीमध्ये हलकी होतात. 20 दिवसांमध्ये प्रत्येक वारकरी एकमेकांचे सुख-दुःख वाटून घेऊन मार्गक्रमण करीत असतात. सकारात्मक वृत्तीचा हा राजमार्ग आहे. मला साम वाहिनीच्या माध्यमातून वारी करण्याची संधी मिळाली. यातून मिळालेला आनंद शब्दांत मांडू शकत नाही. वर्षभर चित्रपट सृष्टीच्या झगमगाटात वावरत असताना तेथील आनंद आणि वारीतील आनंद यात मोठा फरक आहे. तो आनंद त्या काळापुरता टिकून राहतो; मात्र वारीतील आनंद अविस्मरणीय असाच आहे.
|