सर्व शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरेपर्यंत केंद्रे सुरू ठेवणार

सर्व शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरेपर्यंत केंद्रे सुरू ठेवणार

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची घोषणा; २६ हजार केंद्रांवर सुविधा उपलब्ध

मुंबई -  शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होईपर्यंत केंद्रे सुरू ठेवण्यात येणार असल्याची घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. याआधी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना फारच कमी कालावधी दिलेला होता. या मुदतीत उर्वरीत शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरणे अशक्य होते. यासंदर्भात ‘अॅग्रोवन’मध्ये सविस्तरपणे प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत राज्य सरकारने सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होईपर्यंत ग्रामीण भागातील केंद्रे सुरू ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. 

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्टची मुदतीवरून सध्या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. जिल्हा सहकारी उपनिबंधकांकडून ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीसंदर्भात केल्या जात असलेल्या वक्तव्यांमुळे शेतकरी संभ्रमात आहेत. वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात असल्याने गोंधळात भर पडत असून ग्रामीण भागात ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सुविधा केंद्रांपुढे शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झाले होते. 

राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. दीड लाखांपुढील शेतकऱ्यांसाठी एकरक्कमी परतफेड योजनेचा लाभ दिला जाणार आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. तसेच या योजनेत कर्ज पुर्नगठीत झालेल्या शेतकऱ्यांनाही लाभ दिला जाणार आहे. या कर्जमाफीचे लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन अर्जाद्वारे घेतली जात आहे. 

ऑनलाइन अर्ज भरून घेण्यासाठी २६ हजार केंद्रांवर सुविधा उपलब्ध केल्याचे राज्य सरकार सांगत आहे. आपले सरकार सेवा केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा समावेश आहे. 

प्रत्यक्षात, यापैकी १३ हजार केंद्रे बंदच असल्याची टीका राज्य सरकारच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी केल्याने सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. 

राज्यात सध्या एकेका दिवसात एक ते सव्वा लाख शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होत आहेत. राज्य सरकारच्या दाव्यानुसार राज्यात ९० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित सुमारे ७५ लाख शेतकऱ्यांचे ऑनलाइन फॉर्म भरायला पुढचे किमान दीड ते दोन महिने जातील असा अंदाज आहे. त्यातच कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिल्याची चर्चा होती. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना फारच कमी कालावधी राहणार आहे. त्यामुळे या मुदतीत उर्वरीत शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरणे अशक्य होते. यासंदर्भात अॅग्रोवनमध्ये सविस्तरपणे प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत राज्य सरकारने सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होईपर्यंत ग्रामीण भागातील केंद्रे सुरू ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्टची डेडलाइन असणार नाही, हेसुद्धा स्पष्ट झाले आहे.

ऑनलाइन अर्जाची स्थिती (१९ ऑगस्टपर्यंत)
नोंदणी झालेले शेतकरी               आॅनलाइन अर्ज भरून झालेले
१६ लाख ६८ हजार ७२३               १३ लाख ९३ हजार ४४९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com