सुयोग्य नियोजनातून दीडशे एकरांवर भाजीपाला, फळबाग शेती

फळपिकांवर भर देणारे विनोद राठी केळीच्या बागेत
फळपिकांवर भर देणारे विनोद राठी केळीच्या बागेत

जावरा (ता. तिवसा, जि. अमरावती) येथील विनोद राठी गेल्या ४४ वर्षांपासून थोड्याथोडक्या नव्हे, तर आपल्या १३० एकरांवर सुनियोजनबद्ध शेती करीत आहेत. अंगी व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून त्यांनी पीककपद्धतीची आखणी केली आहे. सुमारे २४ एकर क्षेत्र त्यांनी बारमाही भाजीपाला शेतीसाठी दिले आहे. पारंपरिक पिकांएवजी विविध फळपिकांचे प्रयोग करून व्यावसायिक शेतीचा नमुनाच त्यांनी पेश केला आहे. 

जावरा (ता. तिवसा, जि. अमरावती) येथे विनोद राठी यांची वडिलोपार्जीत सुमारे १३० एकर शेती आहे. सन १९६१ मध्ये त्यांच्या वडिलांचे म्हणजे कन्हैयालाल यांचे निधन झाले. त्यामुळे कुटूंबाच्या संपूर्ण शेतीची जबाबदारी आई रजनीबाई, आजी भगीरथीबाई, आजोबा झुंबरलाल यांच्या खांद्यावर आली. विनोद यांच्या कुटूंबात आज त्यांच्यासह दोन बहिणी आहेत. साहजिकच पुढील शेतीची धुरा वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विनोद यांच्याकडे आली. 

पारंपरिक शेतीत बदल 
सुरवातीला राठी कुटूंबीय सोयाबीन, भुईमूग, तूर, कपाशी यासारखी पिके घेत होते. सन १९८६ पासून विनोद यांनी पीकबदल करण्यास सुरवात केली. त्यातून संत्रा लागवड केली. टप्प्याटप्प्याने त्याखालील क्षेत्र वाढविण्यात आले. 

शेतीतील वैशिष्ट्ये 
शेणखताचा वापर- दोन बैलजोडी आहेत. त्यापासून मिळणारे तसेच विकत घेतले जाणारे शेणखत वापरून जीवामृत स्लरी तयार केली जाते. महिन्यातून एकदा वापर होतो. यामुळे मातीतील लाभदायक  जीवाणू वाढण्यास मदत होते असे राठी सांगतात.  

ग्राफ्टिंग तंत्राद्वारे वांग्याची लागवड 
रायपूर (छत्तीसगढ) येथे राठी यांनी ग्राफ्टींग तंत्रज्ञान अभ्यासले. यंदा त्याचा वापर वांगी पिकात केला आहे. असे रोप १२ रुपये प्रति नग या दराने खरेदी केले आहे. जंगली रुटस्टॉकचा वापर करून ग्राफ्टींग केल्याचे राठी यांनी सांगितले. एक एकरात वांगी आहे. दरवर्षी एकरी २० टनांप्रमाणे उत्पादन मिळते. यंदा प्रति झाड फळांची संख्या पाहता उत्पादनात निश्चित दुपटीने वाढ होईल असा त्यांचा अंदाज आहे. आत्तापर्यंत २५ टन उत्पादन हाती आले आहे. दररोज एक क्‍विंटल वांगी विक्रीसाठी अमरावती बाजारात पाठविली जात आहेत. माल दर्जेदार असून चकाकी चांगली असल्याचे राठी यांनी सांगितले. 

काकडीनंतर टोमॅटो 
खरिपात काकडी घेतली जाते. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत टोमॅटो लावला जातो. त्याच्या काढणीनंतर जमिनीला विश्रांती दिली जाते. मग थेट खरिपातच पुन्हा काकडी घेतली जाते. वांग्याचा प्लॉट सुमारे १० महिने चालतो. त्यासाठी स्वतंत्र शेत राखीव ठेवले जाते. काकडीचे एकरी २० टनांपर्यंत, टोमॅटोचे ४० ते ५० टनांपर्यंत तर वांग्याचे २० टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते.  
इस्त्रायल दौऱ्यानंतर शेतीत बदल 
सन २००२ मध्ये राठी इस्त्राईलला अभ्यास दौऱ्यावर गेले होते. तिथून परत आल्यावर त्यांनी काही बदल शेतीत केले. पैकी शेतरस्ते बांधले. सुमारे १३० एकर शिवार ठिबक सिंचनाखाली आणले. त्यांच्याकडे वॉटर स्टोरेज टॅंकच्या जोडीला बोअरवेलचाही पर्याय उपलब्ध आहे. 

शेतीतील उत्पन्नातूनच मुलांना केले उच्चशिक्षित
राठी यांनी अत्यंत मेहनत, सातत्य व सुयोग्य व्यवस्थापनातून शेती प्रगत केली. त्यातील उत्पन्नातूनच मुलांना उच्चशिक्षण दिले. आज मुलगी नेहा पुण्यात नामवंत सॉप्टवेअर कंपनीत कार्यरत आहे. मुलगा आदित्य चार्टर्ड अकाउंटंट असून तो मुंबईत व्यवसाय सांभाळतो. मुलगा चैतन्य बीई आहे. सध्या जिनींगचा व्यवसाय तो सांभाळतो आहे. शेतीतील उत्पन्नाच्या बळावरच या व्यवसायाची उभारणी करता आली. राठी अमरावती येथे राहतात. सुमारे ४० किलोमीटर अंतरावरील शेतात ते दररोज जाऊन येऊन करतात. सकाळी साडेनऊपासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत शिवारात अविरत राबतात. त्यामुळेच आज शेतीत प्रगती करू शकल्याचे त्यांना समाधान आहे. 

पाण्याची साठवणूक 
क्षेत्र भरपूर असल्याने तीन लाख लिटर पाणी क्षमतेचा स्टोअरेज टॅंक बांधला आहे. एक किलोमीटर अंतरावर वर्धा नदी असून, शेतापर्यंत पाइपलाइनद्वारे पाणी आणून ते टॅंकमध्ये साठविले जाते. 

सध्याचे पीकपद्धती नियोजन
    एकूण शेती - १३० एकर
    पैकी बारमाही भाजीपाला - २४ एकर, उर्वरित क्षेत्र- फळपिकांसाठी
    मुख्य फळपिके - संत्रा, मोसंबी, केळी
    मुख्य भाजीपाला पिके- काकडी, टोमॅटो, वांगी 
    संत्रा - ४२ एकरांवर, मोसंबी-१६०० झाडे 
    संत्रा रोपे राष्ट्रीय लिंबवूर्गीय फळ संशोधन केंद्रातून (काटोल) येथून खरेदी केली. आंबिया बहारातील फळे घेतात. व्यापाऱ्यांना बाग विकली जाते.
    संत्रा-मोसंबी उत्पादन- एकरी ७ ते १० टन. अलीकडील काळात एकरी उत्पादकता घटली असल्याचे राठी सांगतात.  
    केळी- दहा एकरांवर, ग्रॅंडनैन हे ऊतीसंवर्धीत वाण घेतात. बाग व्यापाऱ्याला देण्यावर भर राहतो. 
    डाळिंब पाच एकर. मात्र हे पीक व्यवस्थापनाच्या दृष्टीने खर्चिक वाटले. त्यामुळे त्या जागी आता सीताफळ व पेरू यांची लागवड होणार आहे.  
    भाजीपाल्यासाठी बाजारपेठा-अमरावती, नागपूर व मुंबई 

- विनोद राठी, ९४२२१५६६९०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com