एकीच्या माध्यमातून शाश्‍वततेकडे वाटचाल

एकीच्या माध्यमातून शाश्‍वततेकडे वाटचाल

बीड जिल्ह्याला कायम दुष्काळाच्या झळा  सोसाव्या लागतात. तरीही प्रयोगशीलतेच्या माध्यमातून त्मार्ग काढणारे शेतकरी इथे कमी नाहीत. वडवाडी (ता. जि. बीड) येथील बळिराजा कृषी विज्ञान मंडळाने  अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांतून आपली वाटचाल सुकर केली आहे. 

त्याचबरोबर बोरखेड, वडवाडी, महाजनवाडी, अंजनवती या चार गावांतील ३५१ शेतकऱ्यांच्या समन्वयातून २०१५ मध्ये क्रिएटिव्ह शेतकरी प्रोड्यूसर कंपनीची स्थापन करण्यात आली आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे प्रात्यक्षिक, बीजोत्पादन, शेतमालाची खरेदी विक्री, सेंद्रिय शेती आदी उपक्रम राबविले जात आहेत. मंडळ वा कंपनी यांच्या माध्यमातून पूरक, प्रक्रिया आदी विविध उपक्रमांनाही चालना दिली जात आहे. 

एक लाख रोपांची निर्मिती 
बळिराजा कृषी विज्ञान मंडळाने यंदा एक लाख रोपांची निर्मिती केली. यात चिंच, करंज, काशिद, गुलमोहर, सीताफळ, सुबाभूळ, आवळा, बांबू आदींचा समावेश आहे. दुष्काळी भागातील या कामात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जवळपास दोन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे निर्माण करण्यात आले आहे. या शेततळ्यावरच मंडळाच्या निसर्गरम्य परिसराची हिरवळ कायम ठेवण्यासह रोपनिर्मिती केली जाते.  

सहाशे लिटर दुधाचे संकलन  
मंडळामार्फत बोरखेड दूध संकलन केंद्र निर्माण करण्यात आले आहे. गावात सुमारे शंभरपर्यंत दूध उत्पादक आहेत. दररोज सुमारे ६०० ते ७०० लिटरपर्यंत दूध संकलन होते. बारामती येथील दूध संस्थेला त्याचा पुरवठा केला जातो. यामुळे शेतकऱ्यांकडील दूध विक्रीचा प्रश्न मार्गी लागला. 

बियाणे, खताची विक्री
 शेतकऱ्यांना वाजवी दरात वेळेत बियाणे व खते उपलब्ध व्हावीत यासाठी कंपनीतर्फे बियाणे व खत विक्री केंद्र सुरू करण्यात आले. यंदा खरिपासाठी जुलैपर्यंत चार लाखांच्या खताची तर तीन लाख रुपयांच्या बियाण्यांची विक्री या माध्यमातून करण्यात आली. 

शहरातील ग्राहकांचे सर्वेक्षण
 ‘बळिराजा’ मंडळाने आपल्या ५० सेंद्रिय शेती उत्पादकांच्या गटासाठी बीड शहरातील सुमारे २०० ग्राहकांचे सर्वेक्षण केले. ग्राहकांची मागणी व अपेक्षा लक्षात घेऊन पिकांचे नियोजन करण्यात येणार  आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचे नियोजन आहे. 

अवजारे बॅंक
कंपनीकडे शेतीपयोगी अवजारांची बॅंक आहे. शेतकऱ्यांना वाजवी दरात त्याद्वारे रोटाव्हेटर, पेरणी,  मळणी यंत्र, पाणी टॅंकर, मोगडा, नांगरट, फवारणी पंप आदींची उपलब्धता केली जाते. या प्रयत्नामुळे अनेकांना रोजगाराचा पर्याय निर्माण झाला आहे. 

यंत्रसामग्रीची सुविधा 
शेवया तयार करण्याची मशिन 
चटणी कांडप यंत्र 
खडे वेचणी यंत्र (डिस्टोनर) 
पत्रावळी बनविण्याचे यंत्र 
पापड बनविण्याचे यंत्र,  भरडा मशिन 
मधयंत्र,  गर-मैदा वेगळे करण्याचे यंत्र 
पॅकिंग मशिन,  प्रशिक्षण केंद्र 
(एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राज्यस्तरीय वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणांतर्गत) 
 शेतकरी प्रशिक्षण, मेळावे, विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या सहलींची व्यवस्था 
 कृषी विज्ञान मंडळाला नुकतेच जलयुक्‍त शिवारअंतर्गत निवडलेल्या गावातील कर्मचारी, पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम मिळाले आहे. 
 कृषी विज्ञान मंडळाशी निगडित शेतकरी गटाच्या माध्यमातून प्रात्यक्षिके. रेशीम लागवड ते मार्केटिंगपर्यंत शेतकऱ्यांना शासकीय योजनांत सहभागी करून घेऊन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न. 

काही उपक्रम याप्रमाणे  
पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन गावपरिसरात एकूण २७ पर्यंत शेततळी उभारण्यात आली आहेत. 
शेतकऱ्यांनी एकत्र येत यंदा स्वीटकॉर्नची शेती सुरू केली आहे. यात सुमारे ५० शेतकऱ्यांचा समावेश आहे. खासगी कंपनीसोबत करार केला असून किलोला सहा रुपये दर देऊ केला आहे.
कांदा बीजोत्पादन चार वर्षांपासून सुरू आहे. यात ४० शेतकरी सहभागी आहेत. एकरी चार पासून ते कमाल सात क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे. 
कृषी विज्ञान मंडळाकडे माती नमुने तपासण्याची क्षमता असलेली प्रयोगशाळा. गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेत सुमारे दहा हजार नमुन्यांची तपासणी.  
शेततळ्यांमध्ये मत्स्यपालनाचा पर्याय निवडण्यात आला आहे. सध्या एका तळ्यात त्याचा प्रयोग सुरू आहे. आज सुमारे चार टन मत्स्योत्पादन तयार असल्याचा अंदाज आहे. 
शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा चांगला दर मिळण्यासाठी कंपनीअंतर्गत ग्रेडिंग व क्‍लिनिंग युनिट बोरखेडमध्ये उभे केले आहे. यंदा काही टन तूर शासनाला गोदामापर्यंत पोचवली आहे.  
मंडळाच्या माध्यमातून २०१२ पासून निंबोळी पावडर खत विक्री सुरू केली आहे. प्रत्येक वर्षी सुमारे  दीडशे टन निंबोळी खत परिसरातील शेतकऱ्यांना क्विंटलला दोन हजार रुपये दराने विकले जाते. जुलै, ऑगस्टमध्ये खरेदी करून निंबोळी वाळवून प्रक्रिया केल्यानंतर दिवाळीनंतर खत विक्री केली जाते.  

कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून आसपासच्या चार गावांतील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचा व उत्पादन खर्च कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे. 
- महादेव सुरवसे, ९४२३०१८११०   अध्यक्ष, कृषी विज्ञान मंडळ 
  
ॲग्रोवनच्या सततच्या वाचनातून ज्ञानात भर पडते. शेतकरी कंपनीअंतर्गत काम करताना या ज्ञानाचा उपयोग होतो. शेतमाल साठवणुकीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. 
- भाऊसाहेब बोरखेडे, ९४२३६९१३३८  
सचिव, क्रिएटिव्ह शेतकरी प्रोड्यूसर कंपनी लि. 

कृषी विज्ञान मंडळ व शेतकरी कंपनीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करीत शेतीत क्रांती घडविण्याचा व समस्या सोडविण्याचा प्रयत्न आहे. 
- अभिमान अावचर, ९४२१९४५००१ 
अध्यक्ष, ‘क्रिएटिव्ह’ शेतकरी  उत्पादक कंपनी, बोरखेड  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com