गेल्या वर्षीच्या तुलनेत किलोमागे १० ते १५ रुपयांनी दर कमी

गेल्या वर्षीच्या तुलनेत किलोमागे १० ते १५ रुपयांनी दर कमी

सांगली - डाळिंबाच्या मृग हंगामात परतीच्या पावसाने डाळिंबाचे नुकसान झाले. डाळिंबे विक्रीला आली आहेत. प्रतिकिलोस ३० ते ४० रुपये असा दर मिळाला. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रतिकिलोस १० ते १५ रुपयांनी दर कमी आहेत, त्यामुळे लागवड खर्चही मिळणे कठीण झालयं, अशी व्यथा डाळिंब उत्पादक शेतकरी मांडत आहेत. 

जिल्ह्यात सुमारे ६० ते ७० टक्के डाळिंब उत्पादक शेतकरी मृग हंगामातील डाळिंबाचा बहार धरतात. सध्या मृग हंगामातील डाळिंबाची विक्री करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. सांगलीत यंदाच्या हंगामात सध्या स्थानिक व्यापारी तसेच मुंबई, हैद्राबाद, मद्रास येथील व्यापारी डाळिंबाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात दाखल होत आहेत. दोन वर्षांपूर्वी डाळिंबाला सरासरी ८० ते ९० रुपये प्रतिकिलोस असा दर मिळाला होता. मात्र, गेल्यावर्षी नोटबंदी झाली आणि डाळिंबाचे दर खाली आले. ते आजपर्यंत वाढले नाहीत, अशी माहिती डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. 

पाणी टंचाई असल्याने अगोदरच डाळिंब उत्पादक मेटाकुटीला आले होते. त्यातून टॅंकरने पाणी देऊन  डाळिंबाच्या बागा जगविल्या. मात्र, परतीच्या पावसाने  डाळिंब पिकावर घाला घातला. डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला. फूळगळही मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे डाळिंबाच्या उत्पादनात सुमारे ४० टक्के घट झाली आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच यंदाही डाळिंबाचे दर वाढले नाहीत. त्यामुळे डाळिंबाचा खर्चही मिळणे कठीण झाले आहे. 

डाळिंब खरेदीसाठी व्यापाऱ्यांची गुजरातला पसंती 
जिल्ह्यात डाळिंब खरेदीसाठी दिल्ली, कोलकाता, बांगलादेश या ठिकाणचे व्यापारी खरेदीसाठी येतात. मात्र, यंदाच्या हंगामात अद्यापही व्यापारी दाखल झाले नाहीत.   याचे कारण म्हणजे गुजरात येथील डाळिंबाची खरेदी करण्यासाठी व्यापारी गेले आहेत. गुजरातमधून इतर राज्यात डाळिंब घेण्यासाठी वेळ आणि वाहतुकीचा खर्च कमी असल्याने व्यापाऱ्यांनी गुजरातमधील डाळिंबाला पसंती दिली आहे. 

यंदाच्या हंगामातील डाळिंबाचे दर गेल्या वर्षीपेक्षा १० ते १५ रुपये प्रतिकिलोने कमी आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांत असे दर कधीच नव्हते. सध्या १० टन डाळिंबाची विक्री करायला आली आहे, पण दर नसल्याने काय करावे, असा प्रश्‍न पडला आहे. दर नसल्याने आर्थिक नुकसान आहेच.
- जालिंदर पाटील, डाळिंब उत्पादक शेतकरी  आटपाडी, जि. सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com