देवगड, रत्नागिरी हापूसवर अखेर स्वतंत्र 'जीआय'ची मोहर

Ratnagiri Alphonso
Ratnagiri Alphonso

पुणे : तेवीस शेतीमालांच्या भौगोलिक मानांकनात (जीआय) देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र राज्याने देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस यांच्यासाठी गुरुवारी (ता. २०) स्वतंत्र 'जीआय' प्राप्त करण्यात यश मिळविले आहे. कोकणच्या मातीतील अस्सल चवीच्या व स्वादाच्या हापूस आंब्याला 'जीआय'ची मोहर लागावी यासाठी आंबा बागायतदारांचा सुमारे साडेचार वर्षांपासून संघर्ष सुरू होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. महाराष्ट्रातील एकूण जीआय मिळविलेल्या शेतीमालांची संख्या आता तब्बल २५ वर गेली आहे. 

दरम्यान, देवगड व रत्नागिरी हापूसच्या नावावर होणारी अन्य आंबा विक्रीची फसवणूक 'जीआय'मुळे आता रोखणे शक्य होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही कोकणच्या आंब्याची शान वाढीस लागणार आहे. 

केंद्र सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाच्या मुंबई येथील कार्यालयात गुुरुवारी (ता. २०) देवगड हापूस व रत्नागिरी हापूस यांना 'जीआय' मिळविण्यासंबंधी सादरीकरण व त्यावर सुनावणी झाले. या वेळी पुणे येथील जीएमजीसी कंपनीचे अध्यक्ष गणेश हिंगमिरे, अोंकार सप्रे, देवगड, रत्नागिरी भागाचे प्रतिनिधित्व करणारे काही आंबा बागायतदारही उपस्थित होते.

या वेळी देवगड व रत्नागिरी भागांतील हापूस आंब्याची चव, स्वाद, येथील वैशिष्ट्यपूर्ण हवामान, माती, लागवडीचा इतिहास आदी विविध बाबींचे कागदोपत्री व शास्त्रीय पुरावे यथासांग सादर करण्यात आले. अर्थात, गेल्या साडेचार वर्षांपासून या आंब्याला 'जीआय' मिळविण्याचे प्रयत्न सुरू होतेच. मात्र प्रत्येकवेळी तांत्रिक बाबींमुळे जीआय मिळविण्यात अडचणी येत होत्या.

अखेर गुरुवारी सादरीकरणानंतर जीआय देण्यावर बौद्धिक संपदा विभागाने शिक्कामोर्तब झाले. 'रत्नागिरी हापूस' या नावाखालील जीआयमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील आंब्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील केळशी आंबा उत्पादक संघाच्या नावाने जीआयचे प्रमाणपत्र मिळेल. तर 'देवगड हापूस'च्या नावाखालील जीआयमध्ये देवगड तालुक्याचा समावेश असेल. देवगड तालुका आंबा उत्पादक संघाला हे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे हिंगमिरे यांनी सांगितले. 

हा तर शेतकऱ्यांचाच विजय 
देवगड तालुका आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष अजित गोगटे 'ॲग्रोवन'शी बोलताना म्हणाले, की साडेचार वर्षांपासून आम्ही कोकणातील बागायतदार जीआय मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत होतो. त्यासाठी मुंबई, चेन्नई, हैदराबाद आदी ठिकाणी बौद्धिक संपदा विभागाच्या विभागीय कार्यालयांमध्ये तब्बल पाच सुनावण्या झाल्या. त्यासाठीचा सर्व खर्च बागायतदारांनी स्वतःच्या खिशातून पेलला. आमच्यासोबत दापोली येथील कृषी विद्यापीठानेदेखील हापूस आंब्याच्या जीआय नोंदणीसाठी अर्ज दिला होता. मात्र त्यात देवगड किंवा रत्नागिरी असा स्वतंत्र विचार नव्हता. तर कोकणातील सर्व जिल्हे त्यात सर्वसमावेशक होते. मात्र आम्ही बागायतदारांनी देवगड व रत्नागिरी हापूसची वैशिष्ट्ये विषद केली. अखेर सरकारकडून त्यास सहमती मिळून दोन्ही भागांतील हापूसला स्वतंत्र जीआय देण्याचा निर्णय झाला. कर्नाटकातील हापूस आमच्या नावाने विकून ग्राहकांची फसवणूक केली जाते. आता ती थांबण्यास मदत होईल, असेही गोगटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com