'गौरीनंदन'ने ठेवले भेसळमुक्त, दर्जेदार बियाणे निर्मितीचे लक्ष्य

'गौरीनंदन'ने ठेवले भेसळमुक्त, दर्जेदार बियाणे निर्मितीचे लक्ष्य

शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील उच्चशिक्षित तरुणांनी ११ वर्षांपूर्वी ओम निरंजन शेतकरी गटाची स्थापना केली. भेसळमुक्त, दर्जेदार बियाणे उपलब्ध करणे हेच ध्येय ठेवून पीकपद्धती व बीजोत्पादन कार्यक्रम सुरू केला. आज गटाचे रूपांतर गौरीनंदन शेतकरी कंपनीत झाले आहे. सुमारे साडेसातशे शेतकरी त्यात सहभागी आहेत. दोनशे एकरांवर आज विविध पिकांचे बीजोत्पादन घेतले जात असून, महापीक बियाणे ब्रॅंडने एक कोटींची उलाढाल होते आहे. नगरसह पाच जिल्ह्यांत कंपनीने विक्री व्यवस्थाही उभारली आहे.  

नगर जिल्ह्यात शनी शिंगणापूर (ता. नेवासा) हे देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे. ऊस हे या भागातील प्रमुख पीक. येथील ॲड. सयाराम बानकर, नितीन बानकर, अनिल सोन्याबापू बानकर यांनी एकत्र येऊन २००८ मध्ये ‘आत्मा’ अंतर्गत ओम निरंजन शेतकरी बचत गटाची स्थापना केली. वीस-तीस सभासदांपासून त्यास सुरवात झाली. भेसळमुक्त व दर्जेदार बियाणे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करणे हाच मुख्य हेतू होता.

गटाचा कार्यविस्तार : ठळक बाबी
  सुरवातीला गहू, हरभरा बीजोत्पादन. नेवासा तालुक्यात विक्री
  बियाण्याचा ‘महापीक’ ब्रॅंड विकसित  
  पंधरा एकरांवरील बीजोत्पादन दरवर्षी वाढत टप्प्याटप्प्याने पन्नास एकरांपर्यंत
  उलाढाल तीन लाखांपासून पन्नास लाखांपर्यंत गेले. 
  उस्मानाबाद, बीड आणि नगर या तीन जिल्ह्यांत विक्री 
  गटात शेतकऱ्यांचा सहभाग वाढू लागला. 
  २०१५ पासून गहू, हरभऱ्यासोबत सोयाबीन, तूर यांच्याही बीजोत्पादनास सुरवात
  २०१८ मध्ये गटाचे रूपांतर गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनीत  

शेतकरी कंपनीचे कार्य दृष्टिक्षेपात
  कंपनीचे सदस्य- ७५०   बीजोत्पादन क्षेत्र- २०० एकरांपर्यंत    यंदा तेवढ्या क्षेत्रावर कांदा, सोयाबीन, हरभरा, गहू, तुरीचे बीजोत्पादन सुरू
विक्री व्यवस्था  
  कंपनीची उलाढाल- एक कोटीपर्यंत 
  विक्री- नगर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांत. कंपनीचा राज्यात नावलौकिक वाढत आहे.
  नगर जिल्ह्यात विक्री प्रतिनिधी नियुक्त
  अन्य ठिकाणी वितरक
यांत्रिक सुविधा, मजूरबळ  
  बियाणे साठवणीसाठी २०१५ मध्ये पंधरा लाख रुपये खर्च करून १०० मे. टन तर गेल्या वर्षी २५ लाख रुपये खर्चून कृषी विभागाच्या मदतीने २५० मे. टन क्षमतेचे गोडाऊन 
  बियाणे पॅकिंग साठवणीसाठी गोदाम.
  कंपनीच्या कामासाठी एक वितरण अधिकारी, एक उत्पादन अधिकारी व चार कर्मचारी नियुक्त 
  बियाणे प्रतवारी व पॅकिंगसाठी सात महिलांना रोजगार
  सुमारे ११ लाख रुपयांचे ग्रेडिंग यंत्रही आहे. 
  नगरसह अन्य जिल्ह्यांत बियाणे पोच करण्यासाठी चारचाकी वाहन 

‘गौरीनंदन’ कंपनीच्या ठळक बाबी 
लाभांशवाटप 
२००८ पासून गटात सहभागी शेतकऱ्यांनी शेअर्स जमा केले होते. आठ वर्षांत त्यापोटी सुमारे चाळीस लाख रुपये जमा झाले. उत्पादक कंपनी स्थापन केल्यानंतर ७५० शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांचे शेअर्स जमा केले. आज कंपनीकडे पन्नास लाखांचे भागभांडवल आहे. २०११ पासून बियाणे विक्री व अन्य उत्पन्नातून येणाऱ्या नफ्यातून दर दिवाळीच्या पंधरा दिवस आधी आठ ते नऊ टक्के सभासदांना लाभांशवाटप केला जातो. 

अन्य कंपन्यांच्या बियाण्याचे मार्केटिंग 
‘गौरीनंदन’ कंपनीने नगर जिल्ह्यातील दोन शेतकरी कंपन्यांसोबत करार करून त्यांच्या बियाण्यांचेही मार्केटिंग यंदा महापीक ब्रॅंडखाली केले. त्याद्वारे ३६ टन तूर व सोयाबीन बियाण्यांची विक्री झाली. त्या बदल्यात करारानुसार टक्केवारीचे पैसे मिळाले. कंपनीचे अध्यक्ष नितीन बानकर बीई (मेकॅनिकल) असून, संचालक ॲड. सयाराम बानकर, भाऊसाहेब  बानकर, ॲड. रामेश्वर कुरकुटे, सुखदेव लांडे, अनिल बानकर, चंद्रशेखर शेंडे यांना कंपनीच्या वाटचालीत मोठा पुढाकार आहे. 

कांदा साठवणूक 
'गौरीनंदन’ ने यंदा शेतकऱ्यांकडून सरकारी नियमानुसार हमी दराने नाफेडमार्फत ३०० टन कांदा खरेदी केला. तो शेतकऱ्यांच्या चाळीत साठवला. त्या बदल्यात शेतकऱ्यांना कंपनीने प्रतिकिलो एक रुपया भाडेशुल्क दिले. त्यातून शेतकऱ्यांच्या कांद्याला दर मिळाला. भाडेशुल्कातून आर्थिक फायदा झाला. कंपनी आता शेतकऱ्यांसाठी अभ्यास सहलही आयोजित करणार आहे.  

शेतकऱ्यांना भेसळमुक्त व खात्रीशीर बियाणे देणे हेच आमचे ध्येय आहे. महापीक त्याचा ब्रॅंड आहे. कृषी विद्यापीठांकडून पायाभूत बियाणे घेऊन प्रमाणीत बियाणे तयार करतो आहोत. 
 नितीन बानकर-पाटील, ७९७२७२५९७३, अध्यक्ष, ‘गौरीनंदन’ शेतकरी उत्पादक कंपनी 

अभ्यासातून शेती केली तर नक्कीच फायदा होतो हेच आममच्या कंपनीच्या वाटचालीतून स्पष्ट झाले आहे. शासनाने अशा कंपन्यांना आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमी दर मिळण्यालाही त्यातून मोठी मदत होईल. कंपनीचाही नावलौकिक वाढेल. 
 सयाराम बानकर, ९८५००१७२००, ज्येष्ठ संचालक, गौरीनंदन, 

धान्य साठवणुकीत सवलत
कंपनीकडे साडेतीनशे मे. टन क्षमतेची दोन गोदामे आहेत. त्यात शेतकऱ्यांना माल सावणुकीसाठी सवलत दिली जाते. शासन प्रति क्विंटलला १६ रुपये आकारते. कंपनी मात्र त्याच्या पन्नास टक्के म्हणजे ८ रुपये दराने साठवणुकीचे भाडेशुल्क घेऊन शेतकऱ्यांना आधार देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com