नदीजोड प्रकल्पालाही महत्त्व द्या

नदीजोड प्रकल्पालाही महत्त्व द्या

खानदेशात तापी, सुकी नदीला दरवर्षी पूर येतो. सातपुडा पर्वतापासून नजीक असलेल्या सपाट भागातून तापी नदी वाहते. कितीही दुष्काळ असला तरी तापी नदीला पूर येतोच. मागील वर्षी पाऊस कमी झाला, पण तापी नदीला चार वेळेस चांगला पूर आला. तापी नदी खानदेशातील मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा, जळगाव, अमळनेर, शहादा, नंदुरबार या तालुक्‍यांमधून जाते. या नदीच्या आजूबाजूला खानदेशातील मोठा भाग आहे. तापी नदीच्या काठावरील गावे समृद्ध आहेत. पाणी भरपूर असल्याने कापूस, केळी, पपई व इतर रब्बी पिकांची चांगली शेती तापी नदीकाठी होते. 

दुसरी महत्त्वाची नदी म्हणून गिरणा नदीचा उल्लेख केला जातो; परंतु गिरणा नदी ही आवर्षण प्रवण भागातून येते. तिला दुष्काळ असला तर पूर येत नाही. गिरणा धरण ५० टक्केही भरत नाही. याच धरणावर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव आदी तालुक्‍यांमधील रब्बीचा हंगाम अवलंबून असतो. हे धरण पूर्ण न भरल्याने मागील वर्षी दोन आवर्तने मिळाली. यंदा दोन आवर्तने मिळतील की नाही, हा प्रश्‍न आहे. कारण धरणात फक्त ४६ टक्के जलसाठा आहे. पिण्याचे पाणी व इतर बाबी लक्षात घेऊन प्रशासन पाणी आरक्षण देते. 

खानदेशचा मोठा भाग दुष्काळी आहे. कारण या भागात नद्यांना पूर येत नाहीत. पाऊस कमी असतो; परंतु या दुष्काळी भागात पाणी पोचविण्यासाठी तापी नदीचा उपयोग करता येईल. कारण तापी नदीवर फक्त हतनूर धरण जळगाव जिल्ह्यात आहे. पुढे धुळे जिल्ह्यात सुलवाडे व नंदुरबार जिल्ह्यात प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज आहे; मग महाराष्ट्रात कुठेही प्रकल्प तापीवर नाही. पाणी पुढे गुजरातेत उकाई धरणात जाते. तापीचे पाणी वाया जाते. ते अडवून किंवा मोठ्या यंत्रणेद्वारे उचलून दुष्काळी भागातील नद्यांपर्यंत पोचविले तर खानदेशातील आवर्षण प्रवण भागात पाणीच पाणी होईल. नदीजोड प्रकल्प त्यासाठी राबविला पाहिजे. नदीजोड प्रकल्पात जमिनी, शेती, रस्ते यांचे अडथळे येतील. ते येऊ नयेत यासाठी भूमिगत मोठ्या क्षमतेची जलवाहिनी असावी. तापीचे पाणी बुराई नदी, गिरणा नदी, वाघूर नदी, अंजनी नदी, तितूर नदी व पश्‍चिम भागातील इतर लहान प्रकल्पांपर्यंत पोचवायला हवे. जलयुक्त शिवार अभियानातून कामे झाली. त्यात पाऊस झाला तर पाणी साचेल; परंतु तापी नदीचे पाणी उचलून इतर नद्या, प्रकल्पांमध्ये आणले तर बारमाही नद्या वाहतील, पाणी टिकून राहील. इतर प्रकल्पांसारखे महत्त्व या नदीजोड प्रकल्पास दिले तर नक्कीच फायदा होईल. 
-खुबानसिंग पाटील, शेतकरी, जामनेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com