केशर आंब्यासह फळबाग केंद्रित शेतीचा विकास

Mango
Mango

परभणी जिल्ह्यातील कारेगाव येथील समर्थ सोपानराव कारेगावकर यांनी फळबाग केंद्रित शेतीचा विकास केला आहे. केशर आंबा, मोसंबी, जांभूळ, पेरू, आवळा आदींची विविधता जोपासली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या रसाळ आंबा फळांची बॅाक्स पॅकिंग करून थेट ग्राहकांना विक्री होत आहे.

कारेगाव (ता. जि. परभणी) येथे कृषिभूषण सोपानराव आवचार-कारेगावकर, बाळासाहेब आवचार, मारोतराव आवचार या भावांचे कुटुंब आहे. हलक्या ते भारी प्रकारची त्यांची ४० एकर शेती आहे.  विहिरीला मुबलक पाणी होते त्या वेळी केळी आणि ऊस होता. रसायनमुक्त काकवी तयार करून विक्रीही केली जायची.  

शैक्षणिक बाजू भक्कम 
सोपानराव यांना २००७ मध्ये कृषिभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांना दोन मुले आहेत. मोठा कुलदीप चित्रकार तर धाकटा समर्थ यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून बी.एस्सी (कृषी) पदवी तर गुजरातमधील दंतेवाडा येथीर सरदार पटेल कृषी विद्यापीठातून एम.एस्सी.(कृषी अर्थशास्त्र) पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. आपल्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करायचे ठरवून चार वर्षांपासून समर्थ यांनी पीक पद्धतीला आधुनिक वळण दिले आहे.  

सुधारित पीक पद्धती 
  अलीकडील काही वर्षांपासून पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने केळी व ऊस पीक पद्धती बंद केली. 
  सोबत शाश्वत उत्पन्न देऊ शकणाऱ्या मोसंबी, आवळा, आंबा फळपिकांची लागवड केली. यातही तुलनेने कमी पाण्यात येणाऱ्या फळपिकांवर अधिक लक्ष केंद्रित केले.
  हंगामी पिकांसह हळद हे मुख्य झाले. 
  दुग्ध व्यवसाय, गांडूळ खत निर्मिती, रोपवाटिका या पूरक व्यवसायांतून उत्पन्नाचे पर्याय निर्माण केले.
  फळशेतीचा विस्तार १८ एकरांपर्यंत केला आहे. सुमारे ३२ एकरांत करवंदाचे नैसर्गिक कुंपण तयार केले आहे.
  चारा, धान्यासाठी चार एकर ज्वारी. 
  दोन विहिरी तसेच जायकवाडी धरणाचा फायदा. 

फळझाडांची संख्या (सुमारे)
  आंबा : ५९०    आवळा- ९०० 
  मोसंबी- २५०    जांभूळ- ७० 
  पेरू- २८०    शेवगा- ९०० 

आंबा फळबाग
सुमारे पाच एकरांवर आंबा लागवड केली आहे. आठ वर्षाच्या या बागेतील ८० टक्के झाडे केसर जातीची आहेत. उर्वरित दशहरा, मल्लिका, हापूस, पायरी आदी वाण आहेत. मराठवाड्यातील विविध भागातील स्थानिक चवीच्या पाच गावरान जातीच्या मातृवृक्षांची लागवड केली आहे. त्यातून सरस जातींची निवड ते करणार आहेत. लागवडीनंतर पाच वर्षांनी केशर आंब्यांचे उत्पादन सुरू झाले आहे. त्या पहिल्या वर्षी पाच एकरांत सहा टन, मागील वर्षी १४ टन उत्पादन मिळाले. यंदा १२ टन उत्पादन अपेक्षित आहे.

व्यवस्थापन बाबी 
  ठिबक सिंचन पद्धतीने पाणी 
  सिंगल सुपर फॅास्फेट, शेण स्लरीचे फर्टिगेशन
  गांडूळ खत तसेच आच्छादनाचा वापर
  फळमाशीच्या नियंत्रणासाठी गंध सापळे 
  जैविक आणि रासायनिक कीडनाशकांचा वापर. मोहराच्या वेळी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काच्या दोन ते तीन फवारण्या आलटून पालटून 
  बागेच्या व्यवस्थापनासाठी हनुमान धनवे यांची मदत 
  फूलधारणा झाल्यापासून सुमारे १५० दिवसांत आंबा परिपक्व होतो. तोडणीच्या कामासाठी कुशल मजुरांची मदत 

बॉक्स पॅकिंग करून विक्री 
साळीचे (साळवण) तणस, गवताचे काड, पेपर कटिंग यांचा माच लावून आंबे नैसर्गिकरीत्या पिकविले जातात. त्यासाठी ८ ते १२ दिवसांचा कालावधी लागतो. एके वर्षी व्यापाऱ्याला ८८ रुपये प्रति किलो दराने विक्री केली होती. परंतु त्यातून म्हणावा तितका फायदा न झाल्याने ग्राहकांना बॉक्सद्वारे थेट विक्री सुरू केली आहे. एक किलोपासून ते १० किलोपर्यंत पॅकिंग होते. प्रति किलो कमाल १५० रुपये दर मिळतो.

सोशल मीडियावरून मार्केटिंग 
कारेगावकर परिवाराचा परभणी शहर तसेच परिसरात चांगला जनसंपर्क आहे. नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या त्यांच्या दर्जेदार आंब्याची चव चोखंदळ ग्राहकांना चाखावयास मिळत आहे. त्यामुळे दरवर्षी ग्राहकांकडून मागणी येत आहे. व्हॅाटसॲप ग्रुप, फेसबुक आदी सोशल मीडियावरून आंब्यांचे मार्केटिंग समर्थ करतात. फोनवरही ऑर्डर स्वीकारली जाते. 

रसाळ मेजवानी 
केवळ विक्री करणे हा कारेगावकर यांचा हेतू नसतो. नातेवाईक, मित्र परिवार यांच्यासाठी आपल्या रसाळ आंबा मेजवानाचा कार्यक्रम ते दरवर्षी कारेगाव येथील आपल्या मळ्यात नेहमी करतात. त्यास अत्यंत चांगला प्रतिसाद लाभतो. 

अन्य उत्पादन 
  मोसंबीचे एकरी पाच टन उत्पादन. शेतातून थेट विक्री.
  आवळा- प्रति झाड २० ते ४० किलो उत्पादन. स्थानिक दर न परवडल्यास मुंबईला विक्री. 
  जांभळाच्या कोकण बहाडोली वाणाचे दोन वर्षांपासून प्रति झाड २० किलो उत्पादन. 
  त्याची किलोला ८० ते १०० रुपये दराने विक्री. 
  दरवर्षी तीन एकरांत गादीवाफा पद्धतीने हळद. एकरी ३२ ते ३४ क्विंटल उत्पादन.

एकीचे काम
समर्थ यांना चुलतभाऊ अभिमन्यू व संदीप यांची शेतीत मोठी मदत होते. काका बाळासाहेब दुग्ध व्यवसायाची जबाबदारी सांभाळतात.

अन्य पूरक व्यवसाय
  निसर्गानंद नावाने शासनमान्य रोपवाटिका. दरवर्षी आंब्याच्या केसर, दशहरी जातींची १२ ते १५ हजार रोपनिर्मिती. प्रति रोप ६० ते १०० रुपये दराने विक्री. 
  जांभूळ व सीताफळ (बाळानगर) प्रत्येकी सहा हजार तर करवंदाची ८ ते १० हजार रोपनिर्मिती. 
  परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, नगर जिल्ह्यातील शेतकरी रोपे घेऊन जातात. 
  साई समर्थ नावाने कन्सल्टन्सी.  
  सुमारे १५ म्हशी. दररोज दोन वेळेचे मिळून शंभर लिटर दुधाचे संकलन.  
  शेणापासून गांडूळखत निर्मिती होते. आठ रुपये प्रति किलो दराने विक्री.

- समर्थ कारेगावकर, ९९२२०४०४०७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com