डाळींब शेतीतून मिळविले भरघोस उत्पादन

डाळींब शेतीतून मिळविले भरघोस उत्पादन
डाळींब शेतीतून मिळविले भरघोस उत्पादन

शेती हा व्यवसाय असला तरी शेतीमध्ये परवडत नाही. असेच अनेक शेतकऱ्यांचे मत असते. शेती ही आनंदाने व नवनवीन प्रयोग करत केल्यावर तिच्यात निघणाऱ्या उत्पादनात वाढ होते. दुग्धव्यवसाय करणारे वरूडे (ता. शिरूर ) गावचे भैरवनाथ रंगनाथ काळे यांनी देखील डाळींबाची नऊ एकर शेती फुलवली आहे. या पिकातून त्यांनी 120 टन डाळींब उत्पादन केले आहे. आकर्षक डाळींबाने परीसरात ही बाग पाहण्यासारखी झाली आहे. डाळींब बागेला कुंपन करत असताना कुंपनाला 3 हजार सागाची झाडे लावली. या सागापासूनही त्यांना भरीव उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

शिरूर तालुक्यातील वरूडे गावातून एक किलोमिटर अंतरावर उद्योजक भैरवनाथ रंगनाथ काळे यांची शेती आहे. उद्योग व्यवसायानिमित्त ते नेहमी परदेशी दौऱ्यावर असतात. डेअरीचा व्यवसाय करत त्यांना शेती व्यवसायाची आवड आहे. त्यामुळे त्यांनी येथील नऊ एकर क्षेत्रावर भगवा जातीचे 3 हजार झाडे लावली आहेत. या शेतीचे नियोजन देखील त्यांनीच कामगारांना लावून दिले आहे. प्रामाणीक पणा व विश्वास याला महत्व दिल्यानेच त्यांच्या डाळींबाची बाग बहरताना दिसत आहे.

लगावड तंत्र
2010 मध्ये त्यांनी येथील क्षेत्रात मशागत करून डाळींबाची बाग लावण्याचे ठरविले. शेणखत, लेंडीखत प्रमाणानुसार टाकून 9 बाय 13 या पद्धतीने भगवा जातीचे 3 हजार झाडे लावण्यात आली. बागेची योग्य निगा राखण्यासाठी जामखेडचे बबनराव मोहळकर व उमरगाचे मुकेश गायकवाड यांनी त्यांना मदत केली आहे. झाडाची छाटणी व योग्य पद्धतीने फवारणी करण्याचे तंत्र अवगत केले आहे. या झाडांना त्यांनी जिवामृत खतांचा अधिक वापर केला आहे. शेण, गोमुत्र, बेसनपिठ, दसपर्णी, यांचे मिश्रण करण्यात येते. यासाठी त्यांनी गावराण गायीची जोपासणा केली आहे. हे जीवामृत ते ठिबकच्या सहाय्याने झाडांना देत असतात.

झाडांची जोपासणा
डाळींब शेती करत असताना या झाडांचे आयुष्य कसे वाढेल याकडे अधिक लक्ष द्यावे लागते. झाडे मोठी झाल्यावर लोखंडी पोलच्या सहाय्याने तारांची बांधणी केली आहे. त्यामुळे फळांचे वजन झाडे पेलवू शकेल या पद्धतीने त्यांची बांधणी केली आहे. योग्य अंतर असल्याने फवारणी व इतर कामे देखील सुरळीत होताना दिसत आहेत.

मजूर व पाणी व्यवस्थापन...
संत्रा बाग, डाळींब बाग, नारळाची झाडे, चिक्कूचा बाग, सागाची झाडे यामुळे हा परीसर सगळीकडे हिरवागार दिसतो. त्याचे व्यवस्थापन ठेवण्यासाठी पालघर व कोकणी भागातून मजूर त्यांनी ठेवले आहेत. या शेतीला चासकमानच्या उजव्या कालव्यातून पाणी आणले आहे. या ठिकाणी त्यांनी 5 कोटी लिटर चे शेततळे तयार केले असून त्याठिकाणी पाणी साठवले जाते. त्यातून ठिबंकव्दारे पाणी झाडांना दिले जात असते. योग्य पाणी व्यवस्थापनामुळेच त्यांची शेती फुलली आहे.

उत्पादन...
पाचव्या वर्षी त्यांच्या या बागेला फळे लगडली. आवडीतून शेती करत असताना नफ्याकडे न बघता या बागेकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. कामगारांना वेगवेगळ्या उत्कृष्ठ फळबागा दाखवून प्रशिक्षीत करण्याचे काम ते करत असतात. पठारावर व हवेशिर बाग असल्याने त्यांना पहिल्याच तोड्यात 80 टन माल निघाला. दुसऱ्या तोड्यात 100 टन डाळींबाचा माल निघाला. या वर्षी त्यांचा तिसरा तोडा आहे. या वर्षी त्यांच्या डाळींबाची बाग अधिकच बहरली आहे. त्यामुळे 120 टन डाळींबाचे उत्पादन निघेल असे येथील डाळींबाचे व्यापारी हाजी रशीद पठाण व सरपंच दस्तगीर मुजावर यांनी सांगितले. या डाळींबाच्या शेतीला 30 लाख रूपये खर्च आला असून 60 लाख रूपयांचे उत्पादन होणार असल्याचे काळे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com