अकोला : जिल्ह्यात सोयाबीनला पुन्हा झळाली आली असून, बुधवारी (ता.२) अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल आठ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने, यावर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन पेरणीवरही जोर दिला असून, येत्या खरिपातही पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याचे सरासरी खरीप क्षेत्र दोन लाख १८ हजार ८८६ असून, त्यापैकी ८६ ते ९५ टक्के क्षेत्रावर दशकापूर्वी सोयाबीन पेरणी होत होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पेरणी क्षेत्र वाढत गेले असून, खरीप २०२१ मध्ये तर, १०० टक्के म्हणजे सरासरीपेक्षाही अधिक दोन लाख १८ हजार ९०६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून खरिपात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढत असले तरी, भाव मात्र हमीभावापेक्षाही कमी म्हणजे प्रतिक्विंटल दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंतच मिळत होता. त्यामुळे सोयाबीन उत्पादक चिंतेत होते. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला चांगले दिवस आले असून, गेल्या हंगामात उच्चांकी दहा हजार रुपायांपर्यंत भाव मिळाला.
गेल्या काही दिवसांत पुन्हा भावात घसरण होऊन चार ते पाच हजार रुपायांपर्यंत भाव आले होते. मात्र, चार ते पाच दिवसांपासून परत भाव वधारायला सुरुवात झाली असून, बुधवारी (ता.१) अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल आठ हजार रुपायांपर्यंत भाव मिळाले. त्यामुळे पुढील हंगामातही चांगले भाव मिळण्याच्या अपेक्षेणे सोयाबीन पेरणीलाच पसंती देणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
तेलाचे भाव पेटले
सध्या सोयाबीन तेलाच्या भावात मोठी दरवाढ झाली असून, पुढेही तेल महागण्याचे संकेत व्यापारी वर्गाकडून देण्यात येत आहे. त्याला सोयाबीनचे वाढलेले दर व सोयाबीनच्या उत्पादनात झालेली घट सुद्धा कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या ठोक मध्ये सोयाबीन तेल १७० रुपये किलो दराने विकले जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.