तीन भावांनी सात एकराची शेती नेली बारा एकरापर्यंत 

तीन भावांनी सात एकराची शेती नेली बारा एकरापर्यंत 

अस्वली स्टेशन, ता. २४ : उभाडे (ता. इगतपुरी) गावातील गंगाधर वारुंगसे यांचे सुमारे १५ सदस्यांचे कुटुंब एकत्रित राहून शेती, दुग्धव्यवसाय यशस्वीरीत्या करीत आहे. श्री. वारुंगसे  यांना तानाजी हा एकच मुलगा. शिवाजी आणि सचिन ही मृत वडीलभाऊ विठोबाची मुले. सर्वांत धाकटा भाऊ रंगनाथ यांना नितीन आणि एकनाथ, अशी दोन मुले. कुटुंबाकडे सुरवातीला वडिलोपार्जित सात एकर शेती होती. मात्र, मागील काही वर्षांत या कुटुंबाने ही शेती १२ एकरांपर्यंत नेली आहे.

संयुक्त कुटुंबातील जबाबदाऱ्या 
सचिन दुग्धव्यवसाय, नितीन पीठगिरणीचे व्यवस्थापन, तर तानाजी शेतीची जबाबदारी पार पाडतात. केवळ शेतीवर अवलंबून राहिले तर उत्पन्नाचा स्रोत वाढवता येणार नाही, हे वारुंगसे यांनी पूर्वीच जाणले होते. १९९४-९५ मध्ये दोन गावरान म्हशींपासून त्यांनी पूरक व्यवसायाला सुरवात केली. हा नफ्याचा व्यवसाय असल्याचे लक्षात आल्याने वारुंगसे कुटुंबाने दुग्धव्यवसाय वाढवत नेला. आज कुटुंबाकडे १५ म्हशी आहेत. दिवसाला सुमारे ५० ते ५५ लिटर दूध मिळते. सर्व दूध एकनाथ वारुंगसे रतीब घालतात. कायम हिरवा चारा मिळण्यासाठी गावाशेजारील शेतात चारा पिकाची लागवड केली आहे.

कुटुंबाकडे आज १२ एकर बागायती शेती तयार झाली. पारंपरिक दुग्धव्यवसायही वाढला. तीन वर्षांपासून गावात पीठगिरणीचा व्यवसाय सुरू केला. त्यातूनही वीजबिल वजा होता २५ ते ३० हजारांपर्यंत नफा मिळतो. म्हशीच्या गोठ्यातील शेणखताचा वापर दर वर्षी वाढवत नेल्याने रासायनिक खतांचा वापर कमी केला. उसाची शेती सोडल्यास खरीप, रब्बी पिकांना रासायनिक खते देणे बंद केले आहे. घरच्या १५ म्हशी असल्याने दर वर्षी २५ ते ३० ट्रॉली खत तयार होते. त्याचा दर वर्षी टप्प्याटप्प्याने वापर केला जातो. मागील हंगामात ज्या जागेवर खत टाकले, ती जागा सोडून दुसरीकडे खत टाकले जाते. 

उल्लेखनीय उत्पादन 
भात हे खरिपातील मुख्य पीक असून, रब्बीत गहू, बागायती पिकांमध्ये टोमॅटो, काकडी, फ्लॉवर, वांगे, हिरवी मिरची ही पिके घेतली जातात. गेल्या काही वर्षांपासून हिरवा कडबा चारा खाद्य पीकही घेतले जात आहे. जवळपास पाच एकरात पशुखाद्य आहे, तर उर्वरित क्षेत्रात बागायत केले जाते. शेणखतामुळे जमिनीचा पोत चांगला सुधारल्याने पिकांचे उल्लेखनीय उत्पादन मिळत आहे. शेतीच्या आधारे गावात चांगले घर उभारले. घरात सर्व सुखवस्तू आल्या. दर वर्षी शेतजमीन खरेदी केली जाते.

कष्टप्रद शेती सुखद
शेतीला दोन पूरक व्यवसायांची जोड दिली. प्रत्येकाची स्वतंत्र चूल मांडण्यापेक्षा एकत्र राहून शेती करण्याची वृत्ती, केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता दुग्धव्यवसाय व अलीकडील काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रीप इरिगेशनद्वारे बागायती शेतीची दिलेली जोड. यातून या कुटुंबाने कष्टप्रद झालेली शेती सुखासमाधानाची करण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या काळात एकीच शेतीला जगवेल, अशी त्यांची धारणा आहे.

तीन भावांचे एकत्रित कुटुंब असल्याने शेतीवरील भार समान वाटला जातो. शेतीला दोन पूरक व्यवसायांची जोड दिल्याने उत्पन्न वाढविणे शक्‍य झाले आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी वाटून घेतली आहे. काळाची पावले ओळखत आम्ही शेतीचे नियोजन आखतो.
- गंगाधर वारुंगसे, प्रयोगशील शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com