नगर ः मागेल त्याला काम आणि मजुरीचा दाम देण्यासाठी जिल्हाभरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची दोन हजार 481 कामे सुरू करण्यात आली. त्यात 11 हजार 682 मजुरांना हमीचा रोजगार मिळत आहे. प्रशासनाने 27 हजार 938 कामे करण्याची तयारी ठेवली आहे. या कामात 88 लाख तीन हजार दिवासांचा रोजगार देण्याची क्षमता त्यांत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईच्या संदर्भात खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या. या परिस्थितीत गरज असेल, त्या प्रत्येकाला रोजगार पुरविण्याची पूर्ण तयारी केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हाभरात ग्रामपंचायत एक हजार 623 व इतर यंत्रणा 858 अशी दोन हजार 481 कामे सुरू करण्यात आली. यावर 11 हजार 682 जणांना रोजगार उपलब्ध झाला. या योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरास सरासरी दोनशे सहा रुपये मजुरी प्रति दिवस मिळत आहे.
वृक्ष संगोपन, संवर्धन, निगराणी आदी रोजंदारीच्या कामाबरोबरच ब्रासवर केल्या जाणाऱ्या कामांचा यात समावेश आहे. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतीची 18 हजार 711 कामे तसेच इतर यंत्रणांतर्फे नऊ हजार 214, अशी एकूण 27 हजार 925 कामे करण्याची तयारी ठेवली आहे. या कामातून जिल्हाभरात 88 लाख तीन हजार दिवसांचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सध्या अडीच हजार कामे सुरू आहे. त्यात 12 हजार जणांना रोजगार उपलब्ध होत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली मागेल त्याला काम देण्याची दक्षता घेतली जात आहे.
- उदय किसवे, उपजिल्हाधिकारी
तालुकानिहाय मजुरांची उपस्थिती
अकोले-919
जामखेड-694
कर्जत-1485
कोपरगाव-232
नगर- 825
नेवासे-825
पारनेर-1050
पाथर्डी-1016
राहाता-748
राहुरी-516
संगमनेर-967
शेवगाव-906
श्रीगोंदे-907
श्रीरामपूर-612
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.