CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची घोषणा; अहमदनगर आता अहिल्यादेवीनगर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar district name change as ahilya devi nagar cm eknath shinde big announcement politics

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची घोषणा; अहमदनगर आता अहिल्यादेवीनगर

जामखेड (जि. नगर) : राज्यातील दोन शहरांची नावे बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, ‘अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवीनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,’ अशी घोषणा केली. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आज जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी जमलेल्या जनसमुदायाच्या साक्षीने त्यांनी हे जाहीर केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘‘अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य हिमालयाच्या उंचीचे होते. नामकरणामुळे नगरचे नावही हिमालयाएवढे उंच होणार आहे. या नामकरण सोहळ्याचे साक्षीदार होता आले, हे सरकारचे व आमचे भाग्य आहे.

दोन वर्षांनी अहिल्यादेवींची ३०० वी जयंती होत आहे, ही जयंती भव्य स्वरूपात व सर्वांना हेवा वाटेल, अशी साजरी केली जाईल.’’ राज्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी, सरकारने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतल्याचेही सांगितले. धनगर समाजासाठी शेळी, मेंढी सहकार विकास महामंडळाची स्थापना करून दहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक स्थानिक नेते आणि पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकरांचे माहेरकडील वंशजही उपस्थित होते.

‘धनगर समाजाला न्याय दिला’

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘‘सरकार हिंदुत्ववाद्यांचे असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव नामकरणाचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे अहमदनगरचे नामकरण महत्त्वाचे आहे. आपण मुख्यमंत्री असताना धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र मध्यंतरी सरकार बदलल्यावर धनगर समाजाला काहीही मिळाले नाही.

शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर या समाजाला न्याय दिला. धनगर समाजासाठी दरवर्षी २५ हजार घरे बांधली जाणार आहेत. समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मला व मुख्यमंत्री शिंदे यांना अहिल्यादेवींचा आशीर्वाद मिळो.’’

आमदार पडळकर म्हणाले, की चौंडीत होणाऱ्या कार्यक्रमातील सन्मान व अपमान समाज लक्षात ठेवतो. अनेक सरकार आले आणि गेले. मागील सरकारला याची जाणीव नव्हती. मागच्या सरकारने अहिल्यादेवी भक्तांचा अवमान केला.

त्यामुळे त्यांचे सरकार गेले. आमदार राम शिंदे यांनी अहमदनगरच्या नामकरणाचा निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदे यांना केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्यक्षात घोषणा केल्यावर अहिल्यादेवी भक्तांनी पिवळे झेंडे फडकावत अहिल्यादेवींच्या नावाचा जयजयकार केला.

दरम्यान, सामाजिक कार्यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील प्रत्येकी एका महिलेस मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा दृकश्राव्य संदेश प्रसारित करण्यात आला. पालकमंत्री विखे पाटील यांनी आभार मानले. 

पुढीलवर्षी मोदींनी यावे

चौंडी येथे राष्ट्रपती, लोकसभेचे सभापती, अनेक केंद्रीय मंत्री आणि अनेक मुख्यमंत्री येऊन गेल्याचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले. ‘येथे अद्याप पंतप्रधान आलेले नाही. मात्र पुढील वर्षी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चौंडीत आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी,’ असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Ahmednagar